राज्यात यंदा पाऊस कसा? CM फडणवीसांच्या इशाऱ्याने चिंता वाढली, यावेळी नुकसान… शेतकऱ्यांना फटका?

CM Fadnavis on Monsoon : एका अहवालानुसार राज्यातील 181 तालुक्यांमध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला फटका बसण्याची शक्यता आहे. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

राज्यात यंदा पाऊस कसा? CM फडणवीसांच्या इशाऱ्याने चिंता वाढली, यावेळी नुकसान... शेतकऱ्यांना फटका?
FM Fadnavis on Rain Prediction
Image Credit source: Google
| Updated on: Jun 07, 2026 | 3:14 PM

राज्यात मान्सून दाखल झाला आहे, तळ कोकणाच्या काही भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. असं असलं तरी यंदा राज्याच्या विविध भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. एका अहवालानुसार, राज्यातील 353 तालुक्यांपैकी 181 तालुक्यात कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या पावसाबाबत भाष्य केले आहे. फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

राज्याच्या या भागात कमी पावसाचा शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यंदा 181 तालुक्यांमध्ये कमी पावसाची शक्यता असल्याच्या अहवालाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘हे अल निनोच वर्ष आहे. यंदा सरासरी पाऊस जरी 92 टक्के पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि अवर्षण प्रवण भाग यात सरासरी अंदाजापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना वारंवार सुचित करत आहे की पेरणी कधी केली पाहिजे, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही. कमी पावसातही कसं नुकसान टाळता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत.’

कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागासह जगभरातील इतरही काही संस्थांनी यंदा एल निनोच्या प्रभावामुळे भारतासह दक्षिण आशियातील अनेक भागात कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे, तसेच कमी पावसामुळे राज्यातील काही भागासह देशाच्या काही भागात दुष्काळाचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.

अल-निनो म्हणजे काय?

अल-नीनो ही नैसर्गिक हवामानाशी संबंधित घटना आहे. मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान असामान्यरीत्या वाढल्यामुळे ती निर्माण होते. यामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होतो, यंदा अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे भारतासह शेजारील देशांमध्ये कमी पावसाची शक्यता आहे. साधारणपणे अल-निनो दर दोन ते सात वर्षांनी येतो आणि सुमारे 9 ते 12 महिने सक्रिय राहतो. मार्च ते जूनदरम्यान त्याची निर्मिती सुरू होते आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान तो सर्वाधिक प्रभावी ठरतो. यंदाही एल निनोचा प्रभाव असल्याने कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, यामुळे शेतीसह अनेक क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Follow Us