Weather Update : पुढील 48 तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे; अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका, आयएमडीकडून हाय अलर्ट
सध्या राज्यभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, देशातील टॉप टेन अतिउष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली असून, हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात सध्या उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. विदर्भ चांगलाच तापला आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्याचं तापमान हे 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. देशातील टॉप टेन उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश झाला आहे. विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सरासरी तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर शुक्रवारी देखील विदर्भातील नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासोबतच मराठवाडा देखील चांगलाच तापला आहे. दरम्यान तापमान वाढल्यामुळे सध्या दुपारच्या वेळेस रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत.
मात्र उष्णतेमुळे हैराण झालेल्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे पुढील 48 तासांमध्ये तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तरी देखील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये तापमानात घट होऊन विदर्भासह उर्वरीत राज्यात तापमान हे 40 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान जरी तापमानात घट होणार असली तरी दुसरीकडे पावसाच्या रुपाने महाराष्ट्रावर आणखी एक मोठं संकट आता येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील 24 तास उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र त्यानंतर 2 मे पासून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2 तारखेनंतर विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अर्लट देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्राज्ञ एस. डी सानप यांनी दिली आहे. दरम्यान काही लोकांकडून तापामानाबाबत समाज माध्यमांवर चुकीचे संदेश पसरवले जात आहेत, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, हवामान विभागाकडून अधिकृत माहिती दिली जात आहे, त्यावर विश्वास ठेवा असं आवाहानही यावेळी त्यांनी केलं आहे.