
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. एकीकडे मतदानाचा उत्साह असताना दुसरीकडे राज्याच्या विविध भागांतून हिंसाचार आणि संघर्षाच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. नाशिकच्या इगतपुरीतील अमानुष हल्ल्यापासून ते बीडच्या परळीतील ईव्हीएम तोडफोडीपर्यंतच्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. प्रशासनाने यातील अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे तपासाला गती दिली आहे.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथे एका किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण हिंसाचारात झाले. विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी शेतकरी बाळासाहेब शिंदे व त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. जमावाने शरद शिंदे यांना लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी बेदम मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. संतापजनक बाब म्हणजे, यावेळी घरातील महिलांनाही मारहाण करण्यात आली असून, पीडित महिलेचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी घोटी पोलिसांनी या प्रकरणी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. भाजपचे अंभई गटाचे उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. भाजप उमेदवाराला अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे नानेगाव आणि नायगाव मतदान केंद्रावर काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता. बिडकीन येथील मतदान केंद्रावरही विनाकारण गर्दी करणाऱ्या महिलांना पोलिसांनी बाहेर काढल्याने पोलीस आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वादही रंगला.
धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड जिल्हा परिषद गटात निवडणुकीला गालबोट लागले आहे. भाजप उमेदवार सीताराम वनवे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल मोरे यांच्या समर्थकांमध्ये मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जोरदार संघर्ष झाला. मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप भाजपने केला असून, यावरून दोन्ही गट आमनेसामने आले. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता.