राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले तर…, मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य

सध्या दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे, यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले तर..., मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2025 | 3:30 PM

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.  29 ऑगस्ट रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी आज विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.

येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे, यावर बोलताना पहिल्यापेक्षा पाचपट संख्येनं अधिक मराठा समाज या मोर्चात सहभागी होईल, हा मोर्चा अंतरवाली सराटी मार्गे, अहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट, कल्याण मार्गे मुंबईत धडकणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर, आमचं पोट दुखायचं कारण नाही. जुनी म्हण आहे की “मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे”
कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावेत असं होतं. पण ते  कशासाठी म्हणत होते? माहिती नाही. दोन भावांनी एकत्र यावं,  वेगळे लढले तरी पडतात मग एकत्र येऊन पडू द्या, पण लोकांची इच्छा आहे ना, दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं. लोकांची इच्छा आहे दोघांनी एकत्र यावं, त्यात आमचा काही फायदा नाही, एकदा होऊन जाऊ द्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत, मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  मराठा आणि धनगर वेगळा नसून एकच आहे, आम्ही वेगळे नव्हतो आणि यापुढे नसणार, कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षाणाला धनगरांचा विरोध नाही, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.