वर्षा बंगल्याच्या स्लॅबवर बसून आंदोलन करेन, मनोज जरांगे असं का म्हणाले? 29 ऑगस्टच्या आंदोलनाविषयी मोठी घोषणा!
मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी येथे जाऊन अभ्यासकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनाची दिशा, मागण्या यावर त्यांनी अभ्यासकांसोबत सखोल चर्चा केली. ही चर्चा संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जातेय परंतु ते रद्द केले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. तसेच मराठा आरक्षणाशी संबंधित इतरही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. सरकारने या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. याच मागण्यांना घेऊन ते येत्या 29 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथे आंदोलन करणार आहेत, असे बोलले जात होते. याच आंदोलनाबाबत आता जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केलीय. वेळ आली तर मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या स्लॅबवरही आंदोलन करायला तयार आहे, असंही जरांगे यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.
मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी येथे जाऊन अभ्यासकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनाची दिशा, मागण्या यावर त्यांनी अभ्यासकांसोबत सखोल चर्चा केली. ही चर्चा संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना मुंबई, वर्षा बंगला आपल्या सर्वांचा आहे. मी वर्षा बंगल्याच्या स्लॅबवर बसून आंदोलन करीन. आम्हाला शेअर मार्केटचे बैल, विमान, बंगले बघू द्या, काय हरकत आहे, असं जरांगे म्हणाले.
तसेच, 29 ऑगस्टचं आंदोलन अंतरवाली सराटी येथेच शांततेत होणार आहे. 27 ऑगस्ट रोजी गोदापट्ट्यातील मराठा समाजाची बैठक घेणार आहे, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यावरून मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वातावरण बिघडवलं आहे, असा मोठा आरोप जरांगे यांनी यावेळी केला.
काल मला चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला होता. काल त्यांनी मला चार वेळा फोन केला आणि म्हणाले माझी काळजी करा. मी चूक दुरूस्त करतो असे ते म्हणाले. बावनकुळेंनी कलेक्टरला फोन करून सांगितले आणि मला कळाले. समाजाच्या विरूद्ध काम करणाऱ्या नेत्यांसोबत मला बसायचं नाही. 29 ऑगस्ट हे सगळे विषय मार्गी लावणार आहे, असे म्हणत त्यांनी मराठा समाजाला आश्वासित केले.