
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडला. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, त्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीमध्ये त्यांची गटनेता म्हणून देखील निवड करण्यात आली आहे, दरम्यान सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे. राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही, मात्र अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे. राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही. त्यांनी आता सर्वांना सोबत घेऊन चालावं, आता गिधाड घिरट्या घालायला लागले आहेत, त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल, अजितदादांसोबत न दिसणारे गिधाड आता दिसू लागले आहेत, सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या या ढेकणांवर लक्ष ठेवावे, असा सल्ला यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना दिला आहे. काही अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीनं उपमुख्यमंत्रिपद स्विकारलं असावं, पार्थ आणि जय पवार यांना दादांनी काही सल्ला दिला असेल तर त्याचं त्यांनी पालन करावं, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठं विधान केलं होतं, आपल्याला उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याबद्दल काहीही माहिती नाही, आपल्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा त्यांचा डावपेच असू शकतो, मी सांगू शकत नाही. सर्वांना घेऊन चालावं. गिधाडं आता घिरट्या घालायला लागले आहेत. त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. हे ढेकण आणि गिधाडं घात करू शकतात, सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत घ्यावं, हे ढेकणं खूप रक्त पिऊ शकतात, त्यावेळी कुटुंबच तुमच्या कामाला येईल, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.