फडणवीस साहेब डोक्यातील हवा काढा, नाही तर राज्यात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगे यांचा इशारा
manoj jarange politics : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मोठा इशारा दिला आहे. कुणबी प्रमाणपत्र कुणाच्या आदेशाने झाले, असा सवाल देखील त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यानंतर काहींना मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समोर आलं आहे. मराठवाड्यात तब्बल 4 नगरसेवकांचं थेट जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समोर आलं आहे. परंतु या निर्णयावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब डोक्यातील हवा काढा, नाही तर राज्यात फिरण मुश्किल होईल, असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा दिलाय.
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून माध्यमाशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘प्रसाद लाड काय करेन. ते करतात मरमर. यांना वाटोळच करायचं ठरवलं आहे. उदय सामंत आणि लाड यांना तीनदा सांगून होत नाही. कारण त्यांचं ऐकत नाही. फडणवीस यांनी डोक्यातील हवा बाहेर काढा. एकदा आंदोलन सुरू झालं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल’.
‘तुमचे नेते आमच्या विरोधात भाषणं करत आहेत. बैठका घेत आहेत. त्यांना तुम्ही उपनेते करता. इतकं येडं करू नका. तुम्हाला आमचं एक मत मिळणार नाही. आशिष शेलार यांना मी काय होतंय हे सांगितलं. अतुल सावे त्यातच आहे हे मी सांगितलं. मी कुणाचंही नाव घेत नाही. छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडेंचं नाव घेतलं का. घेतलं नाही. बाकीच्यांचं घेत आहे. बावनकुळेमुळे भाजपचं वाटोळं होईल. आम्हाला भोग भोगावे लागू देऊ नका, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.
वाटोळं करायचं बंद करा; जरांगेंचा सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, ‘मंत्री राधाकृष्ण विखेंना यातील काही माहीत नाही. बोगस कशाला काही माहीत नाही. आरक्षणाचा काही मेळ नाही. तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष आहात. बावनकुळे करू शकतात, तुम्हीही करू शकतात. ५० टक्क्यावर आरक्षण गेलंय, ते बोगस नाही का. मराठ्यांपर्यंतच अक्कल चालवू नका. आपल्या घरचे आहेत म्हणून पायदळी तुडवू नका. १९९४मध्ये १६ टक्के आरक्षण दिलं ते बोगस आहे की नाही ते बघावं. खरंच पोटजाती ओबीसींच्या होत्या का हे बघा. मराठे आपले आहेत म्हणून त्यांचं वाटोळ करायचं बंद करा. ते पूर्वी चालत होतं’.