Manoj Jarange Patil : आंदोलनासाठी मुंबईला जायचं की नाही? अखेर मनोज जरांगेंनी फायनल निर्णय घेतला
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. त्यांनी मुंबईत जायचं की नाही या संबंधी आज फायनल निर्णय घेऊन टाकला.

“माझ्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. मी आज तुमच्याशी बोलू शकतोय ते सलायनमुळे. आज आपण समाजासाठी जीव जाळतोय. आपल्या विरोधात जळणारी प्रवृत्ती डोळ्यासमोर ठेवा” असं मनोज जरांगे पाटील उपस्थितांसमोर बोलताना म्हणाले. “ही अंतिम निर्णयाची शेवटची लढाई आहे. शेवटची आहे म्हटल्यावर काय करायचं हे माहित असलं पाहिजे” असं जरांगे पाटील बोलले. मुंबईला जायचं की अंतरवलीत आंदोलन करायचं? असं त्यांनी समोरच्या गर्दीला विचारलं. त्यावर समोरच्या बाजूने मुंबई-मुंबई अशा घोषणा सुरु होत्या. मुंबईला जाण्यासाठी एकमत आहे का? यावर समोरच गर्दी मुंबई, मुंबई ओरडत होती. ‘ठीक आहे मग मुंबईला जायचं फायनल’ असं जरांगे पाटील म्हणाले.
“ठीक आहे मुंबईच फायनल आपण ज्या मार्गावरुन जाणार आहोत तो मार्ग सांगतोय. तुम्हाला सांगतोय विषयाकडे पुन्हा लक्ष ठेवा. आपल्याला समाजाच्या लेकरांना मोठं करायचं आहे. भावना आणि माझ्या समाजाची कदर करायला शिका. समाज हा सगळ्यांचा बाप असतो. मराठ्यांनी पायखाली तुडवले तरी चेंगरुन जातील. त्यामुळे जो मार्ग असेल तो असेल. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की, तुम्ही प्रत्येकवेळी मुंबईला गेलात, या मार्गे गेलात, त्या मार्गे गेलात. पुणेवाल्यांचं म्हणणं होतं की, दोनदा जाताना तुम्ही एकदा चाकण मार्गे, दुसऱ्यांदा शिवाजीनगर मार्गे गेलात. पश्चिम महाराष्ट्रातून पुन्हा फोन आले. आम्ही कुठे कमी पडतोय का?. भावना समजून घ्या. अर्धा पश्चिम महाराष्ट्र घेतला” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईत जायचं आणि जिंकून यायचं
“आपण कुठनही गेलो तरी मुंबईत जायचं आहे आणि जिंकून यायचं आहे. आपण आज जरी मुंबईला पोहोचायच म्हटलं तरी पोहोचू शकतो का?. कारण गाड्या लाखात आहेत आणि त्या पळतात 20-30 च्या स्पीडने. मुंबईला जायला निघालो की इतके मराठे येतील. गर्दी माझ्या समाजाचं बळ आहे. माझा समाज बलशाली आहे. म्हणून ती गर्दी होती. आपल्याला मुक्काम टाकत, टाकत जावं लागतं. एकदिवसात कुणीबी मराठ्यांना मुंबईत नेऊन दाखवा” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अंतरावलीतून जरांगे कुठल्या मार्गाने मुंबईत जाणार?
“तारीख किती ठरवायची. मी तुमच्या हिताच्या पुढे जातो का?. बारीक विचार करत जा कधीपणा. बीड जिल्ह्यात पाटोद्यात पहिला मुक्काम. दुसरा मुक्काम अहिल्यानगर श्रीगोंदा, तिसरा मुक्काम हडपसर. हडपसरचं म्हणणं होत की तुम्ही पुण्याचा भाग मागे ठेवता, आम्हाला एक संधी द्या. पाटोदा, श्रीगोंदा मग हडपसर मार्गे चौथा टप्पा खोपोली रायगड जिल्हा. कोपरखैराणेवाले बोलतात की आम्हाला पण संधी द्या. सध्या तरी खोपोली फायनल पकडून चला. खोपोलीनंतर मग आझाद मैदान तिथे आमरण उपोषण” असं मनोज जरांगे पाटील बोलले.