आमच्याकडे पर्याय नाही, नाहीतर कोरोना वाढेल, हजारो लोकं रस्त्यावर मरतील : यशोमती ठाकूर

| Updated on: Feb 21, 2021 | 5:37 PM

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत पुढच्या आठवडाभरासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे (Minister Yashomati Thakur on Amravati lockdown).

आमच्याकडे पर्याय नाही, नाहीतर कोरोना वाढेल, हजारो लोकं रस्त्यावर मरतील : यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
Follow us on

अमरावती : अमरावतीत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत कोरोनाचे दररोज मोठ्या प्रमाणात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमरावतीत कोरोनाचा विळखा अतिशय घट्ट झाला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन अमरावतीत पुढच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यशोमती ठाकूर यांनी स्वत: पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. यावेळी यशोमती यांनी नागरिकांना मास्क वापरणं आणि नियमाचं पालन करण्याचं भावनिक आवाहन केलं. याशिवाय अमरावतीत आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असंदेखील त्या यावेळी म्हणाल्या (Minister Yashomati Thakur on Amravati lockdown).

‘…तर हजारो लोक मरतील’

“अमरावतीत सात दिवस सध्यातरी काही करता येणार नाही. काही एमरजन्सी असेल तर तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून काही सोय करता येईल. नाहीतर कोरोना केसेस वाढू द्या. हजारो लोकं मरतील रस्त्यावर. आज लोकांना सगळ्या मुभा देऊन सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी सोयीच्या करुनही लोक ऐकत नाही. लोकं मास्क वापरत नाहीत. पोलीस, डॉक्टर आपलं काम करत आहेत. मग आता करायचं काय? त्यामुळे सात दिवसांचा लॉकडाऊन लागू करत आहोत”, असं यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.

‘दंडे खाऊन मरायचं की कोरोना दूर करुन जिवंत राहायचंय?’

“आता आपल्याला विचार करायचा आहे की, आपल्याला काय केलं पाहिजे. दंडे खाऊन मरायचं की कोरोना दूर करुन जिवंत राहायचंय? कडक राहावं लागणार आहे. कडक राहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरलेला नाही”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

1600 बेड्स तयारी

“आम्ही टेस्टिंग वाढवत आहोत. सध्या 1400 बेड्स आहेत. अजून 200 बेड्सची व्यवस्था होत आहे. आम्ही 1600 बेड्सच्या जवळपास तयारी ठेवलेली आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही

“कोरोना संपला पाहिजे यासाठी काय करावं ते तुम्ही मला सांगावं. आम्ही उद्याचा (21 फेब्रुवारी) एक आख्खा दिवस देतोय. उद्या संध्याकाळपासून लॉकडाऊन सुरु करतोय. उद्या रात्री आठ वाजेपासून कंटेन्मेंट झोन आणि लॉकडाऊन सुरु करु. त्याच्याऐवजी आमच्याजवळ दुसरा उपाय उरलेला नाही”, असं यशोमती म्हणाल्या.

जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मूभा

“सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

मास्क वापरण्याची गरज

“स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे. मास्क मोठ्या प्रमाणात वापरण्याची गरज आहे. अंतर ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातत्याने हात धुवून स्वत: ला सुरक्षित करण्याची गरज आहे. यामध्ये जर कुणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय काही करायचं ठरवलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल”, असं त्यांनी सांगितलं.

“आम्ही सगळ्यांकडून मदत मागत आहोत. नगरसेवकांकडेही मदत मागितली आहे. अमरावती आणि अचलपूर महापालिका यांचीही मदत मागितली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली (Minister Yashomati Thakur on Amravati lockdown).

अमरावतीत 12 कंटेन्मेंट झोन घोषित

अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.

अमरावतीत 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

अमरावती मनपा हद्दीत सध्या 2,783 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असून अमरावती शहराला कोरोनाने पूर्णपणे विळखा घातला असल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. तर अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 727 रुग्ण पॉझिटीव्ह आढळूण आले आहेत. आज 2,131 रुग्णांच्या टेस्ट झाल्या. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर 34.11 टक्क्यांवर पोहोचला. आज एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे (Yashomati Thakur Gave Signs About Lockdown In Amaravati).

अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. 359 रुग्ण घेत आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधीकार्‍यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आली आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी : अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा