Raj Thackrey : मोदी नावाचा पत्ता, तो एकदा निसटला की… राज ठाकरे यांनी भाजपला सुनावलं; सत्ता गेल्यावर भाजपलाही…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. देशातील राजकारण भयानक असून, भाजपला भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. मोदी नावाचा 'पत्ता' सटकला की भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळेल, असे राज ठाकरे म्हणाले. या घाणेरड्या राजकारणामुळे देश कोणत्या दिशेने जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देशातील राजकारण भयानक आहे. घाणेरडं आहे. याचा भविष्यात भाजपला त्रास होणारच आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नाही. आताची कृती भविष्यात काय पायंडा पाडतो याचं भान राजकारण्यांना नसेल तर.. कुठे नेणार आहोत देश? असा सवाल विचारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर कडाडून टीका केली आहे. नरेंद्र मोदी नावाचा एक पत्ता आहे, तो सटकला की पत्त्यांच्या बंगला पडणार, जे काही टिकून आहे ते मोदींवर आहे. बाकीच्यांवर नाही. उद्या सत्ता गेल्यावर भाजपला असाच त्रास होईल. तेव्हा काय कराल. कुठेपर्यंत जायचं हे कळलं पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी सुनावलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यात आले होते. ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी एसआयआरबाबत मार्गदर्शन केलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
काय म्हणाले राज ठाकरे ?
देशात, राज्यात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. फोडाफोडीचं राजकारण गलिच्छ आहे. हे उमदं राजकारण नाही. उद्या सत्ता गेल्यावर भाजपला असाच त्रास होईल, तेव्हा काय कराल? कुठपर्यंत जायचं हे कळलं पाहिजे, असं त्यांनी सुनावलं.
ज्या ज्या वेळी जगात एखाद्या सत्ताधाऱ्यांनी विरोधक किंवा दुश्मन संपवले आहेत. त्या त्यावेळी त्यांच्यात विरोधक आणि दुश्मन तयार झाले आहेत. त्यांनीच त्यांना संपवलं आहे. ही प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली आहे. बाहेरचे विरोधक सोडून द्या. तुमच्यात जे विरोधक तयार होतील ते पाहा. हा जगाचा नियम आहे. आणीबाणीच्या वेळी तेच झालं होतं, अशी आठवणही राज ठाकरे यांनी यावेळी करून दिली.
खालचा पत्ता मोदींचा, तो सटकला की बंगला कोसळणार
पत्त्याचा बंगला करायचो ना आपण, तसा हा उलटा आहे. त्यातला सगळ्यात खालचा पत्ता हाँ मोदींचा आहे. तो सटकला की तो बंगला पडणार, सध्या जे काही टिकून आहे ते मोदींवर आहे, बाकीच्यांवर नाही असं राज ठाकरेंनी नमूद केलं. अशा गोष्टीत भयानक राजकारण करत आहात. हे त्यांच्याही अंगाशी येणार आहे. हे कुणासाठी सुरू आहे. कोण करतंय या मागे. हे सर्व अमित शाह यांचं राजकारण सुरू आहे. मी मागे माझ्या भाषणात म्हटलं. शिवसेनेचे सहा खासदार फोडले, मग ते भाजपमध्ये का नाही गेले. टीएमसीचे 22 खासदार फुटले, त्यांचा वेगळा गट का केला? . उद्या जर मला पंतप्रधान पदावर दावा सांगायचा असेल तर आतून विरोध झाल्यावर बाहेरून लोक पाठिंबा देतील. दुसऱ्याने दावा केला तर मी उभे केलेल्यांपैकी कोणी सपोर्ट करणार नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी परिस्थिती स्पष्ट केली. समोरचे विरोधक संपवता, तेव्हा तुमच्यात दुश्मन तयार होतात. हे चित्र राज्यात आणि देशात दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल. बेधुंद सत्ता आल्यावर लोक असे वागतात, असंही त्यांनी सुनावलं.