Explainer : दुष्काळ, शेतकरी मदतीवर बैठक, नेतेमंडळी मात्र काजू-बदाम खाण्यात दंग, नेमकं प्रकरण काय? फडणवीस काय म्हणाले?

काजू बदाम खाण्यात काही चूक नाही. पण संवेदनशीलता नावाचा काही प्रकार असतो की नाही, असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. शिंदेंच्या शिवसेनेत आलेले खासदार संजय जाधव उलट माध्यमांवर राग काढतायत, अशी टीकाही विरोधकांकडून केली जातेय.

Explainer : दुष्काळ, शेतकरी मदतीवर बैठक, नेतेमंडळी मात्र काजू-बदाम खाण्यात दंग, नेमकं प्रकरण काय? फडणवीस काय म्हणाले?
sanjay jadhav and farmers drought
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2026 | 10:02 PM

गजानन देशमुख TV9 मराठी प्रतिनिधी, नांदेड : सध्या महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ तसेच राज्यातील इतर भागात पावसाने दडी मारलीय. मराठवाड्यात तर ही परिस्थिती जास्तच भीषण आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक सुकून गेले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवलाय. अशा स्थितीत सरकारकडून आर्थिक मदत मिळावी, दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी केली जात आहे. याच शेतकऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यात कृषीमंत्री तसेच इतर खासदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याच बैठकीतील एक व्हिडीओ समोर आल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. शेतकऱ्यांची स्थिती, दुष्काळावर बैठक बोलावली जात असताना नेतेमंडळी मात्र काजू-बदामावर ताव मारत होते. याच कारणामुळे सत्ताधाऱ्यांवर प्रचंड टीका केली जात आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? काजू-बदाम कोण खात होतं? विरोधकांनी काय टीका केली? सत्ताधाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं? हे सविस्तर जाणून घेऊ या….

संजय जाधव काजू, बदामावार ताव मारताना दिसले

नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या उपस्थितीत एक आढावा बैठक पार पडली. पण बैठकीतील विषय आणि त्याचं भान मंत्री आणि आमदार खासदार विसरले. या बैठकीत मंत्री मोहोदय तसेच आमदार खासदारांना खाण्यासाठी टेबलावर चक्क काजू बदाम ठेवण्यात आले होते. नुकतेचं ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत आलेले खासदार संजय जाधवही यावेळी काजू, बदामावार ताव मारताना दिसले. बैठकीनंतर खासदार संजय जाधवांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत प्रश्न विचारला, तर जाधवांचा पारा चढला. दुष्काळ आहे म्हणून काजू बदाम खायचे नाही का? असा उलट प्रश्न जाधवांनी विचारला.

संवेदनशीलता नावाचा काही प्रकार असतो की नाही?

काजू बदाम खायला मी माणूसच आहे ना. करा टीका. दुष्काळ आहे म्हणून खायचं नाही का? असा तर्क त्यांनी मांडला. यावर काजू बदाम खाण्यात काही चूक नाही. पण संवेदनशीलता नावाचा काही प्रकार असतो की नाही, असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. शिंदेंच्या शिवसेनेत आलेले खासदार संजय जाधव उलट माध्यमांवर राग काढतायत, अशी टीकाही विरोधकांकडून केली जातेय.

काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

संजय जाधव यांचा काजू, बदाम खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतापले आहेत. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले आहेत. राज्यातील शेतकरी उपाशी आहे. मात्र मंत्री, खासदार तुपाशी आहेत. लोकप्रतिनिधींनी काजू बदाम खाऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

अधिकाऱ्यांवर फोडला खापर

काजू-बदामचा हा वाद पेटल्यानंतर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्यासमोर काजू, बदामची प्लेट नव्हती. एखाद्याने काजू खाल्ले असतील तर त्यात चूक काय, असं ते म्हणालेत. दुसरीकडे मंत्री संजय शिराट यांनी मात्र या प्रकरणाचं खापर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर फोडलं आहे. अधिकाऱ्यांनी डोके वापरले पाहिजे. ते उद्या अंत्ययात्रेलाही काजू बदाम आणतील, असा संताप शिरसाट यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकारावरुन प्रशासनाला जबाबदार धरलंय. बैठकीत अधिकारी ड्रायफ्रूट आणतात. पण संवेदशनशीलता दाखवली पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.

दरम्यान, शासकीय बैठकीत प्रशासनाकडून नाष्टा, चहा आणि ड्रायफ्रूटच्या प्लेटा सजवण्याची पद्धत आहे. पण शेतकरी हवालदील झालेला असताना आणि दुष्काळावरुन चर्चा करताना, तेवढीच संवेदनशीलता अधिकाऱ्यांसह मंत्री,आमदार आणि खासदारांनीही खातानाही दाखवणं गरजेचं आहे. जरी अधिकाऱ्यांनी काजू बदामाची सोय केली असली तरी ते उचलायला सांगू शकले असते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us