नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं; राऊतांचं थेट उषा तांबेंना पत्र, केली मोठी मागणी

अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत.

नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं; राऊतांचं थेट उषा तांबेंना पत्र, केली मोठी मागणी
Sanjay Raut
| Updated on: Feb 23, 2025 | 6:45 PM

अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

संजय राऊत यांचं पत्र जसच्या तसं 

‘ माननीय श्रीमती उषा तांबे, जय महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (98 वे) दिल्लीत साजरे झाले, त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन,

दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले.साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा -परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गौरवापर केला, तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले. त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे का?

दिनांक 23 फेब्रुवारी रोजी ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरीत माफी मागावी.

नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, ‘मी महामंडळाच्या सदस्यांना पन्नास लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले’ हे खरे की खोटे माहीत नाही, पण त्यामुळे महामंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे, अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे.’ असं संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.