आला रे आला… गणपती आला! संपूर्ण मुंबईला बाप्पाचे वेध, प्रतीक्षा शिगेला!
गणेशोत्सवाला अजून सुरुवात झालेली नाही, पण मुंबईच्या हवेत उत्सवाची चाहूल स्पष्ट जाणवत आहे. खूप दिवसांनंतर एखाद्या शहराला एखाद्या आनंदाची इतक्या आतुरतेने वाट पाहताना पाहिलं आणि म्हणूनच हा अनुभव मनाला थोडासा भावूक करून गेला.

संतोष नायरजी, टीव्ही 9 नेटवर्क ग्रुप : गणेशोत्सवाला अजून सुरुवातही झालेली नाही. मुंबईत बाप्पांचे आगमन सोमवारपासून होणार आहे. मात्र, त्याआधीच आज पहिल्यांदा या उत्सवाच्या तयारीला अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. गणोशोत्सव सुरू होण्याआधीच मुंबईच्या वातावरणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
कुठे फुलांच्या माळा तयार होत होत्या
सकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवर वेगळीच लगबग पाहायला मिळत होती. कुठे घरगुती गणपतींच्या मूर्ती पोहोचवण्याची तयारी सुरू होती, तर कुठे मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांसाठी वाहने सजवली जात होती. कुठे फुलांच्या माळा तयार होत होत्या, तर कुठे ढोल-ताशांच्या पथकांची लगबग सुरू होती. संपूर्ण शहर जणू आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होत होतं.
काही मूर्तींना आकार देण्याचे काम सुरू
मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते गणेशमूर्ती तयार करणाऱ्या एका कार्यशाळेने. एका ठिकाणी बाप्पाचे किती वेगवेगळी रूपं पाहायला मिळत होती! काही मूर्तींना आकार देण्याचे काम सुरू होते. तर काही मूर्त्यांची रंगरंगोटी पूर्ण झाली होती. कुठे मुकुट बसवला जात होता, तर कुठे बाप्पांच्या डोळ्यांना अंतिम रूप देण्याचं काम सुरू होतं. कलाकारांचे हात मात्र क्षणभरही थांबत नव्हते.
एक वेगळाच विचार मनात आला की…
कार्यशाळेजवळ उभं राहिल्यावर एक वेगळाच विचार मनात आला. सोमवारी ज्या बाप्पांना एखादं कुटुंब मोठ्या भक्तिभावाने घरी घेऊन जाणार आहे, तेच बाप्पा आज एका कलाकाराच्या हातातून आकार घेत होते. आज ती एक अपूर्ण मूर्ती आहे; पण काही तासांनी किंवा काही दिवसांनी तीच मूर्ती एखाद्या घरातील श्रद्धा, एखाद्या मुलाचा आनंद आणि संपूर्ण कुटुंबाच्या भावविश्वाचा केंद्रबिंदू होणार आहे.
मुंबईच्या रस्त्यांवरही भावनेची अनेक रूपं
कदाचित गणेशोत्सवाची खरी सुरुवात इथूनच होत असावी. बाप्पांची मूर्ती घरात येण्याआधीच ते भक्तांच्या मनात येऊन जातात. आज मुंबईच्या रस्त्यांवरही याच भावनेची अनेक रूपं पाहायला मिळाली. कुणी आपला छोटासा गणपती अगदी काळजीपूर्वक घेऊन जात होतं. कुणी मोठ्या बाप्पांच्या आगमनाची व्यवस्था करण्यात व्यस्त होतं. मुलांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, तर मोठ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाचा आनंद आणि आपलेपणा दिसत होता.
हा अनुभव मनाला थोडासा भावूक करून गेला
गणेशोत्सवाला अजून सुरुवात झालेली नाही, पण मुंबईच्या हवेत उत्सवाची चाहूल स्पष्ट जाणवत आहे. खूप दिवसांनंतर एखाद्या शहराला एखाद्या आनंदाची इतक्या आतुरतेने वाट पाहताना पाहिलं आणि म्हणूनच हा अनुभव मनाला थोडासा भावूक करून गेला. आपण रोजच्या आयुष्यात कितीतरी गोष्टींच्या मागे धावत असतो. काम, जबाबदाऱ्या, बातम्या, चिंता, वेळेची धावपळ याने आपलं जीवन वेढलेलं असतं. या सगळ्यात कधी कधी सणही केवळ कॅलेंडरवरील एका तारखेपुरते मर्यादित होतात. पण मुंबईत आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे काही सण तारखेपुरते मर्यादित नसतात. काही सणांची सुरुवात त्याच्या सुंदर प्रतीक्षेपासूनच होते. गणेशोत्सव हादेखील असाच एक सण आहे.
आला रे आला… गणपती आला!
आज आमच्या मुंबईच्या कार्यालयातही गजाननाचे दर्शन झाले. बाहेर संपूर्ण मुंबई आपल्या आपल्या बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज होत होती आणि आत आमचे बाप्पाही विराजमान होण्याच्या प्रतीक्षेत होते. कदाचित म्हणूनच आज मुंबई काहीशी वेगळी वाटत होती. ढोल अजून पूर्ण ताकदीने वाजू लागलेले नाहीत. आरतीचे सूर अजून सर्वत्र घुमू लागलेले नाहीत. मंडपांमध्ये गर्दीही अद्याप जमलेली नाही. विसर्जनाचा क्षण तर अजून खूप दूर आहे. यंदा बाप्पांच्या आगमनाआधीच त्यांच्या पावलांची चाहूल मुंबईच्या मनाला लागली आहे. मुंबईने जणू मनातल्या मनात सांगून टाकलं आहे. आला रे आला… गणपती आला!