BMC Elections | मुंबई मा जलेबी ने फाफडा… भाजपची वोटबँक फोडण्यासाठी शिवसेनेचं ग्रँड मिशन यशस्वी ठरणार का?

| Updated on: Mar 05, 2022 | 10:44 AM

विशेष म्हणजे मुंबईत गुजराती मतदार हे भाजपची वोटबँक मानली जाते. पूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र होते, तेव्हा हिंदुत्वाच्या मुद्दयावरून गुजराती मतदार शिवसेनेला मत देत होते. मात्र भाजपविरोधात उभी राहिल्याने शिवसेनेला आता गुजराती मतदार फोडायचे आहेत.

BMC Elections | मुंबई मा जलेबी ने फाफडा... भाजपची वोटबँक फोडण्यासाठी शिवसेनेचं ग्रँड मिशन यशस्वी ठरणार का?
Follow us on

मुंबईः देशातली सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal corporation Election) काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने शिवसेना (Mumbai Shiv sena), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षांचा दररोज हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. रोज नवे आरोप, नवे खुलासे, नव्या चौकशी आणि तपासांच्या फेऱ्या होतायत. राजकीय नाट्याच्या एका भागात अशा प्रकारे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ-मोठे कँपेनही राबवले जात आहेत. यापैकीच एक म्हणजे शिवसेनेतर्फे गुजराती मतदारांसाठी (Gujrati Voters) राबवले जाणारे कँपेन. ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपडा’ ही टॅगलाइन वापरत शिवसेनेने मागील वर्षीच हे कँपेन सुरु केले आहे. मात्र येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे कँपेन अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच या मोहिमेतील ग्रँड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील तब्बल 21 उद्योगपतींनी या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला. उद्योगपती आणि व्यावसायिकांना शिवसेनेने सोबत घेतल्याने पक्षाला आर्थिक बळ तर मिळालेच, शिवाय आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या व्होटबँकेला सुरुंग लावण्यातही शिवसेना यशस्वी होऊ शकते, अशी चर्चा आहे.

जलेबी फाफडा आणि वडापावचा बेत

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने यापूर्वीही जलेबी फाफडा आणि वडापावचा बेत आखला होता. या कार्यक्रमाला गुजराती बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला होता. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वात या भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी रोजी गुजराती बांधवांसाठी रासगरबाचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यानंतर 21 गुजराती उद्योजक आणि व्यावसायिकांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला.

आदित्य ठाकरेंचेही केम छो वरळी…

आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून निवडणूक लढवली. त्यावेळी देखील गुजराती बांधवांना साद घालण्यासाठी त्यांनी ‘केम छो वरळी’ असे बॅनर्स झळकवले होते. आदित्य यांची वरळीतून उमेदवारी घोषित झाल्यानंतर अमराठी मतरादांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने हे गुजराती पोस्टर्स झळकवले होते. मात्र विरोधकांनी या पोस्टर्सवरून शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यानंतर हे पोस्टर्स हटवण्यात आले.

गुजरातींसाठी खास मोहीम का?

गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेनं खास कँपेन सुरु केलं आहे. त्यासाठी खास टॅगलाइनही तयार केली आहे. याचं कारणही महत्त्वाचं आहे. मुंबईतल्या 236 जागांपैकी 50 ते 55 जागा अशा आहेत, ज्या ठिकाणी गुजराती मतदार निर्णायक भूमिका घेतात. अशा स्थितीत शिवसेनेला या जागांवर आपला विजय सुनिश्चित करणे गरजेचे आहे. एका अंदाजानुसार, मुंबईत जवळपास 30 लाख गुजराती नागरिक राहतात. विशेष म्हणजे मुंबईत गुजराती मतदार हे भाजपची वोटबँक मानली जाते. पूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र होते, तेव्हा हिंदुत्वाच्या मुद्दयावरून गुजराती मतदार शिवसेनेला मत देत होते. मात्र भाजपविरोधात उभी राहिल्याने शिवसेनेला आता गुजराती मतदार फोडायचे आहेत. त्यामुळेच शिवसेनेनं गुजराती विंग अधिक अॅक्टिव्हेट केलं आहे.

शिवसेनेचं गुजराती कार्ड

राजकीय जाणकारांच्या मते, शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा इतिहास पाहिला तर या नेत्यांनी दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय लोकांच्या मुंबईतील वास्तव्यावरून उघड विरोधी भूमिका घेतली. मात्र गुजरातींसोबत शिवसेनेने कायम मवाळ भूमिका ठेवली. अर्थात यामागे अर्थकारणदेखील आहे. गुजराती व्यापारी वर्गाला दुखावणे शिवसेनेला परवडणारे नाही. सध्या मोदी-शहांमुळे गुजराती मतदार भाजपकडे अधिक झुकलेला आहे. हे खरे आहे, पण पूर्वीपासून गुजराती वर्ग शिवसेनेलाही मतदान करत आलेला आहे. त्यामुळे हा मतदार आपल्याकडेच राखून ठेवण्याची शिवसेनेची महत्त्वाकांक्षा आहे.

मुंबईत खरी स्पर्धा सेना विरुद्ध भाजप

मुंबई महापालिका निवडणुकीत खरी स्पर्धा शिवसेना विरुद्ध भाजप अशी राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर युती करण्याची शक्यता आहे. काँग्रेसने तर यंदाची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्य राजकीय शत्रू भाजपच असेल. राज्यात महाविकास आघाडीत इतर पक्ष एकत्र आल्याने भाजपसाठीदेखील मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

मुंबई महापालिकेतलं पक्षीय बलाबल

2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानुसार पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे-
शिवसेना- 97
भाजप- 83
काँग्रेस- 29
राष्ट्रवादी काँग्रेस- 8
समाजवादी पक्ष- 6
मनसे- 1
एमआयएम- 2
इतर- 3
एकूण – 227

इतर बातम्या-

Viral video : सुपर से भी ऊपर! ‘या’ मुलीचं शरीर रबराचं बनलंय की काय? पाहा ही Flexibility

Shane Warne Death: नियती ! शेन वॉर्नच्या शेवटच्या ट्विटचीही का होतेय चर्चा? का म्हणाला RIP Mate !

पैसे गुंतवण्यासाठी सुरक्षित पर्याय हवा आहे? मग पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, सुरक्षेसह मिळवा अधिक परतावा