Mumbai Rain : मुंबईत धडकी भरणारे वारे वाहणार, ताशी 80 ते 90 किलोमीटर… रेड अलर्ट जारी, गरज असेल तरच घराबाहेर पडा

मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने (IMD) रेड अलर्ट जारी केला असून, ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे, सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai Rain : मुंबईत धडकी भरणारे वारे वाहणार, ताशी 80 ते 90 किलोमीटर... रेड अलर्ट जारी, गरज असेल तरच घराबाहेर पडा
हवामान विभागाने (IMD) जारी केला रेड अलर्ट
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 06, 2026 | 11:47 AM

गेल्या चार दिवसापासून मुंबईसह राज्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून तर पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिली आहे. त्यामुळे आजची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत त्रासदायक ठरली आहे. अतिवृष्टीचा अलर्ट असल्याने मुंबईच्या शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आता परत एकदा मुंबई महापालिकेने धडकी भरवणारा अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने प्रचंड वारे वाहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं महापालिकेने म्हटलं आहे.

महापालिकेच्या सूचना काय?

➡️ भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.

➡️ बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (Park) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे.

➡️ नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे.

➡️ तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्‍यात येत आहे.

➡️ बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे 15 हजार अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अहोरात्र कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत.

 

अनेक ठिकाणी पाणी तुंबले

मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईतील अंधेरी मिलन सबवे, कुर्ला, चुनाभट्टी, घाटकोपर, सायन प्रतिक्षानगरसह अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. या पाण्यातूनच मुंबईकरांना वाट काढून जावं लागत आहे.

Follow Us