कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे : गृहमंत्री

| Updated on: Feb 27, 2020 | 5:36 PM

कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे : गृहमंत्री
Follow us on

मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील 649 पैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर मराठा आंदोलनातील 548 पैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली. ते विधानपरिषदेत बोलत होते. राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान सुरु असलेल्या चर्चेत अनिल देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.

“कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी 649 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. मात्र, सार्वजनिक मालमत्तेवर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमधील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत”, असे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी सांगितलं. याशिवाय नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे घेतले असून शेतकरी आंदोलनातील गुन्हेदेखील मागे घेऊ, अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.

“राज्य शासनाकडून कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरु होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली होती”, असंदेखील अनिल देशमुख यांनी सांगितलं.

“भीमा कोरेगावच्या तपासादरम्यान अनेक शिष्टमंडळे भेटली. तत्कालीन सरकारने आपल्या विरोधात बाजू असेल तर त्याला शहरी नक्षलवाद म्हटले”, असा टोला अनिल देशमुख यांनी भाजपला लगावला. या प्रकरणाची चुकीच्या दिशेने चौकशी झाली असेल तर महाराष्ट्र सरकार पोलीस अॅक्ट किंवा एनआयए सेक्शन 10 नुसार त्यावर चौकशीचा विचार करेल, असंदेखील अनिल देशमुख यावेळी म्हणाले.