‘सरकार कोसळणार हे उपमुख्यमंत्र्यांना माहिती असणार…’, आदित्य ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया

| Updated on: Mar 09, 2023 | 4:24 PM

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर खोचक प्रतिक्रिया दिली. शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आली असणार असा टोला त्यांनी लगावला.

सरकार कोसळणार हे उपमुख्यमंत्र्यांना माहिती असणार..., आदित्य ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात खरंतर चांगल्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण त्यांची अंमलबजावणी कितपत होईल, याबाबत विरोधकांच्या मनात शंका आहे. त्यातूनच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं. “एवढ्या मोठ्या घोषणा हे कदाचित त्यांना माहिती असेल की येत्या एक-दोन महिन्यात सरकार कोसळणार आणि कदाचित निवडणुका लागू शकतात. हे कदाचित उपमुख्यमंत्र्यांना माहिती असेल म्हणून कदाचित घोषणा झाल्या असतील”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“आम्ही पर्यटन विभागातून जो फंड दिलेला त्याला अजून स्थगिती देण्यात आलेली आहे. या बजेटमधून उगाच लोकांना काहीतरी दाखवायचं असं झालेलं आहे. विधानभवनात आणि विविध वेगवेगळ्या मंचावर अनेक घोषणा झाल्या आहेत. रिकाम्या खुर्च्यांसमोर घोषणा झाल्या आहेत. पण एकाही घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, ज्या सरकारमध्ये गद्दार बसलेले आहेत, ज्यांनी अन्नाची शपथ घेऊन गद्दारी केलेली आहे, पाठीत खंजीर खुपसला अशा सरकारवर कुणाचाही विश्वास नाही”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“हे लोकं संत, धर्मांबद्दल बोलणं यांच्या तोंडी शोभत नाही. या थोर व्यक्तींची नावं घेतंय कोण? तर ज्यांनी पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, ज्याने महाराष्ट्राची बदनामी केली, महाराष्ट्राचे उद्योग पळवून लावले. अशी लोकं ही नावं घेतात. हे म्हणजे हसवाफसवी बजेट असं झालेलं आहे”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

“मुंबईच्या सुशोभीकरणाचे पैसे सगळे महापालिकेचे आहेत. स्मारकाचे पैसे आधीच्या सरकारने दिलेले आहेत. नवीन काय? ज्या लोकांना विस्ताराच्या काही आशा दिसत नाही त्यांना कुठेतरी बसवणं गरजेचं आहे. त्यासाठी महामंडळ आहेत. हा बजेट म्हणजे गाजरचा हलवा बजेट आहे. या बजेटमध्ये अनेक घोषणा झाल्या आहेत. मुंबईला नवं काय मिळालं? मुंबईवर यांचा एवढा राग का आहे? मुंबईप्रती त्यांच्या मनात इतका द्वेष का आहे?”, असे सवाल त्यांनी केले. “दोन-तीन घोटाळ्यांची माहिती समोर आली आहे. उद्यापासून त्याबाबत बोलायला सुरवात करु”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.