Shiv Sena : शिवसेनेच्या आमदारानंतर आता खासदारांचीही मागणी, भाजपसोबत चला; ईडीचा इफेक्ट?

राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेले सरकार भाजपाला पचनी पडलेले नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी अनेकवेळा केला आहे.

Shiv Sena : शिवसेनेच्या आमदारानंतर आता खासदारांचीही मागणी, भाजपसोबत चला; ईडीचा इफेक्ट?
संजय राऊत/ईडी
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 22, 2022 | 2:01 PM

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनंतर आता शिवसेनेतील खासदारही (Shivsena MPs) भाजपासोबत चला, असे म्हणू लागले आहेत. आपल्या विरोधकांना सतावण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारकडून सातत्याने ईडी यासारख्या (ED) तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका सातत्याने होत आहे. एकीकडे भाजपाच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी होत असल्याचे ऐकिवात नाही. तर दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या विविध नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या नोटीस येत आहेत. त्यांना सतावण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारकडून (BJP Government) होत आहे. याला कंटाळूनच आता शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्याचे बोलले जात आहे. आमदारांचे हे बंडाचे लोण आता खासदारांपर्यंत येवून पोहोचले आहे. आतापर्यंत केवळ आमदारांनी बंड केल्याच्या चर्चा होत्या. आता शिवसेनेच्या खासदारांमधूनही अशाप्रकारची मागणी होऊ लागली आहे.

भाजपाच्या राजकारणाला कंटाळून…

राज्यात आधी शिवसेना आणि भाजपाती युती होती. मात्र 2019मध्ये ती तुटली. मतभेद वाढले. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. मात्र भाजपाकडून याचा वचपा ईडीच्या रुपाने घेतला जात आहे. सरकार अस्थिर करण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांना ईडीच्या नोटीस आणि त्या माध्यमातून त्रास देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. अनिल परब, नितीन सरदेसाई, भावना गवळी यांच्यासह उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीस आतापर्यंत येवून गेल्या आहेत. या सर्व राजकारणाला कंटाळून शिवसेनेमधून आधीपासूनच मागणी होत होती.

संजय राऊत यांच्याकडून उपस्थित प्रश्न

राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेले सरकार भाजपाला पचनी पडलेले नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी अनेकवेळा केला आहे. एकनाथ शिंदेंना फोडण्याचे षडयंत्र करतानाच त्याच दिवशी अनिल परब यांना नोटीस येते, या धावपळीत ते आमच्याबरोबर असून नयेत, हे षडयंत्र आहे. हे सर्व ठरवून केले जात असल्याचे ते म्हणाले होते. तर शिवसेनेचे जवळपास सहा खासदारही ईडीच्या रडारवर असून त्यांच्याकडूनही आता भाजपाबरोबर जाण्याची मागणी होत आहे.