MLC Election 2022: राष्ट्रवादीचे दोन मतं जेलमध्ये, शिवसेनेच्या अपक्षांवर भिस्त? खडसे, रामराजे कसे निवडून येणार? अजित पवारांची ‘चमत्कारिक’ रणनीती कशी असणार?

| Updated on: Jun 19, 2022 | 12:45 PM

MLC Election 2022: राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अखेर मतदान करण्यास परवानगी मिळालेली नाही. राष्ट्रवादीकडे 53 मते आहेत. मात्र, देशमुख आणि मलिक तुरुंगात असल्याने मतांची ही संख्या दोनने घटून 51 झाली आहे.

MLC Election 2022: राष्ट्रवादीचे दोन मतं जेलमध्ये, शिवसेनेच्या अपक्षांवर भिस्त? खडसे, रामराजे कसे निवडून येणार? अजित पवारांची चमत्कारिक रणनीती कशी असणार?
अजित पवारांची 'चमत्कारिक' रणनीती कशी असणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीला (Maharashtra MLC Election) काही तास शिल्लक उरले आहेत. त्यामुळे आघाडीतचं (maha vikas aghadi) मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांना कोर्टाने मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची सर्व भिस्त शिवसेनेकडील (shivsena) अतिरिक्त मतांवर आहे. शिवसेनेकडे अतिरिक्त चार मते आहेत. ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. तर काँग्रेसनेही शिवसेनेची चार अतिरिक्त मते मिळावीत म्हणून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे शिवसेना ही चार मते कुणाच्या पारड्यात टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आपला कोटा वाढवल्यास दोन्ही काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अखेर मतदान करण्यास परवानगी मिळालेली नाही. राष्ट्रवादीकडे 53 मते आहेत. मात्र, देशमुख आणि मलिक तुरुंगात असल्याने मतांची ही संख्या दोनने घटून 51 झाली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. 27 मतांमुळे राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज जिंकून येणार आहे. दुसऱ्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीकडे फक्त 24 मते उरतात. त्यामुळे दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीला आणखी तीन मतांची गरज भासणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडील चार मते आपल्याकडे खेचण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. तर संजय मामा शिंदे, राजेंद्र येड्रावकर, देवेंद्र भुयार या अपक्ष आमदारांची तीन मते आणि समाजवादी पार्टीची दोन मते अशी पाच मते राष्ट्रवादीकडे असताना शिवसेनेची चार मते राष्ट्रवादीकडे कशाला द्यायची? असा सवालही आघाडीतून केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

खडसे की निंबाळकर? संघर्ष कुणाच्या वाट्याला?

या निवडणुकीत राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आघाडीने पहिल्या पसंतीची मते शिवसेनेच्या सचिन अहिर यांना आणि निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीची मते देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मिळवून निंबाळकर सहज विजयी होऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. तर खडसे यांच्या पारड्यात 24 मते पडणार असल्याने त्यांना आणखी तीन मतांसाठी संघर्ष करावा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे रामराजे निंबाळकर हे मतांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. निंबाळकर यांनी मते मिळवण्यासाठी बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेटही घेतली होती. तर, खडसे यांनी कुणाच्याही भेटीगाठी घेतल्याची चर्चा नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून पहिल्या पसंतीची मते खडसेंना देण्यात येणार असून निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीची मते दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा खरी असल्यास मग निंबाळकर यांना दुसऱ्या पसंतीची राष्ट्रवादीची 24 मते पडतील आणि त्यांना आणखी तीन मतांसाठी संघर्ष करावा लागेल, असं सांगितलं जात आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे तीन अपक्ष आणि सपाची दोन मते असल्याने निंबाळकर यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांची रणनीती

राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने खबरदारी घेतली आहे. भाजप नेत्यांकडून खडसेंना टार्गेट केलं जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: मैदानात उतरले असून त्यांनी राष्ट्रवादीच्या निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. संजय मामा शिंदे, राजेंद्र येड्रावकर, देवेंद्र भुयार या अपक्ष आमदारांशी आणि समाजवादी पार्टीच्या दोन्ही आमदारांशी पवार यांची चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. या शिवाय भाजपला हिसका दाखवण्यासाठी अजित पवार हे भाजपच्या आमदारांशीही संपर्क साधून असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अजित पवारांची रणनीती काय करते हे उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

पाचव्या उमेदवाराचं गणित काय?

शिवसेनेकडे अपक्ष मिळून 62 मते आहेत. काँग्रेसकडे 44 मते आहेत. तर राष्ट्रवादीकडे 51 मते आहेत. काँग्रेसकडे अपक्ष आमदार नाहीत. तर राष्ट्रवादीकडे तीन अपक्ष आणि सपाची दोन असे पाच आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 8 मतांची गरज असून त्यांची सर्व भिस्त शिवसेनेच्या चार अतिरिक्त मतांकडे आहे. दुसरीकडे भाजपकडे 106 आमदार आहेत. पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला 135 मतांची गरज आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली होती. ही मते कायम राहिली तरी भाजपला बाहेरून 12 मते मिळवावी लागणार आहे.