दारूबंदीमुळे माणूस व्यसनमुक्त थोडाच होणार… गडचिरोलीतील दारूबंदी उठवा; हातभट्टीची दारू अधिकृत करा.. सत्ताधारी पक्षातील दोन नेत्यांची अजब मागणी
Lift Ban on Liquor in Gadchiroli : “विषारी दारु कधीपर्यंत पाजता, गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवा” तर दुसरीकडे हातभट्टीची दारू अधिकृत करा अशी अजब मागणी सत्ताधारी पक्षातील दोन नेत्यांनी केली आहे. त्यावरून आता टिकेची झोड उठली आहे. का करण्यात येत आहे ही मागणी?

Lift Ban on Liquor in Gadchiroli : पुण्यातील विषारी दारूकांडाने अनेकांचे जीवे गेले. यापूर्वी सुद्धा विषारी दारुमुळे अनेकांचा बळी घेतला आहे. त्याचवेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेली दारुबंदी उठवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे रिपाईचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टीची दारू अधिकृत करण्याची मागणी केली आहे. या दोघांच्या या मागणीमुळे विरोधक संतापले आहेत. विषारी दारुने जीव जात असताना दारुबंदी उठवण्यावरच सवाल विचारल्या जात आहे.
गडचिरोलीतील दारूबंदी उठवा
-विषारी दारु कधीपर्यंत पाजता, गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेत धर्मराव बाबा आत्राम यांनी केली आहे. दारुबंदी उठण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली. ४० वर्षांच्या दारुबंदीनं गडचिरोली जिल्ह्यात काहीही साध्य झालं नाही. गरीब आदिवासींना महागडी दारु घेऊन प्यावी लागते. गडचिरोलीत अनेक उद्योग येत आहेत. त्यासोबतच मोहाच्या दारुला कायदेशीर करा. आदिवासी संस्कृतीत जन्म, लग्न, मृत्यू अशा वेळेस मोहाची दारु लोक पितात, अशी माहिती आत्राम यांनी दिली.
मंत्रिमंडळात होणार फेरबदल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील मंत्र्यांच्या कामाचं मुल्यमापन करणार आहेत. मुख्यमंत्र्यांना सोबत चांगलं काम करणारे मंत्री हवे आहेत. मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. अजितदादा यांनी मला शब्द दिला होता, आता सुनेत्रा पवार आमच्या नेत्या आहेत. विदर्भाला सुनेत्रा पवार संधी देतील, मंत्री होण्याची माझी इच्छा आहे, असे जाहीर करत आत्राम यांनी मंत्रिपदावरही दावा सांगितला आहे. विधानपरिषद निवडणुकीत आमचे ८० मतदार मी भाजपसोबत बाहेर पाठवले. संपूर्ण मतदार भाजपसोबत आहेत, असा शब्द त्यांनी दिला.
हातभट्टीची दारू अधिकृत करा
तर रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टीची दारू अधिकृत करण्याची मागणी केली आहे. किती ही कारवाया केल्या तरी हातभट्टीची दारू सहज उपलब्ध होते. त्यासाठी हातभट्टीची दारू शासनमान्य अधिकृत करा अशी मागणी त्यांनी केली. हातभट्टी ही सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणारी असेल. हातभट्टीच्या दारूवर शासनाचे नियंत्रण असेल. शासनाला महसूल मिळेल. गोरगरीब मजूर वर्गाचा जीवही वाचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर हे वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले. भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले.
विरोधी पक्षाच्या नेत्याकडूनही समर्थन
दारु बंदी उठवण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याला काही विरोधकांनी विरोध सुरू केला असला तरी, काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. मी चंद्रपुरातील दारूबंदी उठवली. जगात आणि देशात दारू विक्री सुरू आहे. ज्या राज्यांनी दारूबंदी केली त्यांनी ते उठवली. गडचिरोलीत आदिवासी व्यक्तींना मोहफुल दारू पाडून पिण्याचा अधिकार आहे. दारूबंदीमुळे माणूस व्यसनमुक्त थोडी होणार आहे, असा तर्क त्यांनी दिला. याच्यावर होणारी चर्चा ही फालतू चर्चा आहे. प्रगत देशामध्ये या गोष्टीला पूर्णतः मोकळीक आहे. म्हणून धर्मराव बाबा आत्राम यांच्या मागणीला माझं समर्थन आहे, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले.