मिंधे गँगची हीच किंमत? उचला अजून महाशक्तीच्या पालख्या; अंबादास दानवेंकडून शिंदे गट टार्गेट!

चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीत केलय. यावरून शिंदे गटातील नेत्यांना धडकी भरली आहे.

मिंधे गँगची हीच किंमत? उचला अजून महाशक्तीच्या पालख्या; अंबादास दानवेंकडून शिंदे गट टार्गेट!
Image Credit source: social media
| Updated on: Mar 18, 2023 | 3:01 PM

मुंबई | मिंधे गटाला आता कळलं असेल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला का लाथ मारली, असा टोला शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी लागवलाय. राज्यात शिंदे-भाजप युतीच्या (BJP-Shivsena) जागावाटपाची जोरदार चर्चा सुरु असतानाच दानवे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून ही चर्चा सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २८८ पैकी २४० जागा लढवेल तर शिंदे गटाला ४८ जागा देण्यात येतील, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीत केलय. यावरून शिंदे गटातील नेत्यांना धडकी तर भरलीच आहे. मात्र शिंदे गटाच्या विरोधातील नेत्यांनीही तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. याच मालिकेत अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलंय.

दानवे यांचं ट्विट काय?

२०२४ विधानसभेत मिंधे गटाला ४८ जागा देण्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा प्लॅन जाहीर करून टाकला. ‘बाळासाहेबांचा विचार’ पुढे नेणाऱ्या बेगडी मिंधे गॅंगची हीच किंमत का मग? उचला अजून ‘महाशक्ती’च्या पालख्या! आता कळलं असेल उद्धव साहेबांनी का लाथ मारली भाजप सोबतच्या युतीला… अशा शब्दात दानवे यांनी सुनावलंय.

जयंत पाटलांचं गणितच वेगळं…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर शिंदे गटाला सूचक इशाराच दिला आहे. कोणत्याही स्थानिक पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आणायचं हीच भाजपची रणनीती आहे. मग तो शत्रू पक्ष असो वा मित्रपक्ष. भाजप अशा पक्षांना सपवतोच. शिंदे गटाचीदेखील अशीच अवस्था होणार आहे. सध्या शिंदे गाटाला ४८ जागा म्हणतायत. पण निवडणुकीच्या आधी भाजप सर्वे करते. त्यानुसार, शिंदे गटाच्या जागा आणखी कमी केल्या जातील आणि फक्त ५ ते ६ जागा दिल्या जातील, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.

बावनकुळेंचं स्पष्टीकरण काय?

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून स्पष्टीकरण दिलंय. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी तसं वक्तव्य केल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत शिंदे आणि भाजप युतीत अर्ध्या अर्ध्या जागा वाटप होईल आणि याच महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.