पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? मनसेची जहरी टीका

| Updated on: Jun 29, 2020 | 3:23 PM

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सडकून टीका केली आहे (Ameya Khopkar on Varun sardesai notice).

पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? मनसेची जहरी टीका
Follow us on

मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सडकून टीका केली आहे (Ameya Khopkar on Varun sardesai notice). “पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता कुठे बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणार?”, अशी जहरी टीका अमेय खोपकर यांनी ट्विटरवर केली आहे (Ameya Khopkar on Varun sardesai notice).

“महापालिकेचा ‘वरुण’ गोंधळ आतून तमाशा सुरु आहे. आम्ही मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा पर्दाफाश करणारच”, असा घणाघात अमेय खोपकर यांनी केला. याशिवाय “संदीप देशपांडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर 24 तासात स्पष्टीकरण द्या, असं आव्हान देतो. स्पष्टीकरण द्यायची हिंमत आहे का?”, असा सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे.

हेही वाचा : असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, वरुण सरदेसाईंना संदीप देशपांडेंचा थेट इशारा

संदीप देशपांडे यांनी 26 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या मृतदेह बॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याशिवाय कोरोना संकंट काळात महापालिकेने खरेदी केलेले पीपीई किट, मास्क यामध्येदेखील घोटाळा झाल्याचा आरोप केला. यावेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर वरुण सरदेसाई यांच्याकडून संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली.

संदीप देशपांडे काय म्हणाले होते?

“जेव्हापासून कोरोना संकट सुरु झालं तेव्हापासून महापालिका पीपीई किट, मास्क खरेदी करत आहे. या वस्तू खरेदी कसे होतात? या सर्व गोष्टींकडे लक्ष आहे. महापालिकेच्या भ्रष्टाचारात बरेचसे लोक भरेडले जात आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेने मृतदेह बॅग्स खरेदी केल्या होत्या. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. या बॅग्सची किंमत काय ते महापालिकेने ठरवावं. पण कमी गुणवत्तेच्या बॅग्स घेऊन मंबईकरांच्या जीवाशी खेळू नये”, असं संदीप देशपांडे 26 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

“एखादा नवीन माणूस चांगल्या गुणवत्तेची वस्तू महापालिकेला देत असले तर प्रस्थापित कंत्राटदार त्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महापालिकेतील राजकारण्यांना हाताशी धरुन चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू नाकारुन, कमी गुणवत्तेच्या वस्तू जास्त दरात विकत घेण्याचा घाट घातला जात आहे. पण मनसे तसं होऊ देणार नाही. महापालिकेत खरेदीच्या नावाने हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचार सुरु आहे”, असं संदीप देशपांडे म्हणाले होते.

“बीकेसीचा जो डोम उभारला त्यामध्ये लावलेले पंखे भाड्याने लावले आहेत. त्या पंख्याचे 100 रुपये प्रतीपंखा असे भाडे दिले आहेत. नवा पंखा दीड ते दोन हजार रुपयात येतो. महापालिकेने 90 दिवसांचे 9000 हजार भाडे आधीच दिले आहेत. मात्र, तरीही ते पंखे पालिकेच्या मालकीचे नाहीत”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

“विशेष म्हणजे हे सर्व करत असताना महापालिकेने कोरोना संकटाच्या नावावर कोणतंही टेंडर काढलं नाही. कोरोना संकटाच्या नावावर लोकांचे लाखो रुपये भ्रष्टाचारात अडकले आहेत. या सर्व प्रकरणात जी लोकं आहेत त्यांची महापालिकेने सखोल चौकशी करावी. या कंत्राटदारांच्या राजकीय लिंक शोधल्या पाहिजेत. कारण त्यामागे पेंग्विन गँग कार्यरत आहे. या सर्व प्रकरणाची तटस्थ व्यक्तीकडून चौकशी व्हावी”, असं संदीप देशपांडे म्हणाले होते.