शरद पवार माजी केंद्रीय मंत्री होते, पण भाजपने त्यांना साधा पायलटही दिला नाही; अनिल देशमुखांचा पलटवार

| Updated on: Jan 10, 2021 | 3:28 PM

शरद पवार इतके वरिष्ठ नेते असूनही त्यांना भाजप सत्तेत असताना एकसुद्धा पायलट आणि एस्कोर्ट नव्हता, असं अनिल देशमुख म्हणाले (Anil Deshmukh explanation on security Of BJP Leaders and Raj Thackeray Reduced)

शरद पवार माजी केंद्रीय मंत्री होते, पण भाजपने त्यांना साधा पायलटही दिला नाही; अनिल देशमुखांचा पलटवार
Follow us on

मुंबई : ठाकरे सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते आशिष शेलार, भाजप आमदार प्रसाद लाड, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेकडून राज्य सरकारवर टीका होत आहे. या टीकेनंतर राज्य सरकारकडून सुरक्षा व्यवस्था कपात करण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा दाखला दिला (Anil Deshmukh explanation on security Of BJP Leaders and Raj Thackeray Reduced).

“शरद पवार केंद्रात इतके वर्ष मंत्री होते. राज्यात ते अनेकवेळा मुख्यमंत्री झाले. इतके वरिष्ठ नेते असताना त्यांना भाजप सत्तेत असताना एकसुद्धा पायलट आणि एस्कोर्ट नव्हता. अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तरीसुद्धा साधा हवालदार सुद्धा सुरक्षेसाठी नव्हता”, अशी प्रतिक्रिया दिली (Anil Deshmukh explanation on security Of BJP Leaders and Raj Thackeray Reduced).

“आम्ही एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती बनविली. त्या समितीकडून कोणाला जास्त धोका आहे? याचा अहवाल द्यायला सांगितलं. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार कोणत्या नेत्याला कोणत्या प्रकारची सुरक्षा द्यायला पाहिजे, ते त्यांनी सांगितलं. त्यानुसार आता सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कोणाचा कोणता पक्ष आहे? हे बघितलं गेलं नाही. आज स्वतः शरद पवार यांचा फोन आला आणि त्यांनी माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, अशी सूचना केली. सुरक्षा ही कोणाला किती द्यायची हे त्यांना असलेल्या धोक्यावरून ठरविलं जात”, असं स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिलं.

कुणाकुणाच्या सुरक्षेत कपात?

राज्य सरकारने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा रद्द केली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एस्कॉर्ट शिवाय सुरक्षा देण्यात आली आहे. यु. डी. निकम यांना एस्कॉर्टसह वायप्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. तर माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा आधी वायप्लस सुरक्षा होती, त्यात वाढ करण्यात आली आहे. सिन्हा यांना एस्कॉर्टसह वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची झेडप्लस सुरक्षा काढून त्यांना एस्कॉर्टसह वायप्लस, एम. एल. टाहिलीयानी यांची झेड सुरक्षा काढून वाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वायप्लस एस्कॉर्टसह देण्यात आली आहे. जी. ए. सानप यांचीही झेड सुरक्षा काढून वाय सुरक्षा देण्यात आली आहे.

अमृता फडणवीसांच्या सुरक्षेत कपात

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. दिविजा फडणवीस यांचीही वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच दीपक केसरकर यांची वायप्लस सुरक्षा काढून वाय, आशिष शेलार आणि राम नाईक यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाव वाय सुरक्षा देण्यात आली आहे. तर रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा होती. त्यात कपात करून आता त्यांना वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

दानवे, मुनगंटीवार, बडोलेंची सुरक्षा रद्द

अंबरीशराव अत्राम, चंद्रकांत पाटील. संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मोरोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वायप्लस एस्कॉर्टसह, वायप्लस, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

या मंत्र्यांना सुरक्षा

विधान परिषदेचे अध्यक्ष राम राजे निंबाळकर यांना वायप्लस एस्कॉर्टसह, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना वायप्लस एस्कॉर्टसह, आमदार वैभव नाईक यांनी एक्स, संदिपन भुमारे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे-पाटील आणि सुनील केदार आदी मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात; जाणून घ्या Z+, Y सुरक्षा व्यवस्था काय असते? कुणाला दिली जाते?

नेत्यांच्या सुरक्षेत कपात, आता वातावरण तापलं; भाजप, मनसे नेते काय म्हणाले?

संबंधित व्हिडीओ :