Rajya Sabha Election: महाविकास आघाडीचे आमदार फोडण्याचे काम सुरू, केंद्रीय तपास यंत्रणांचाही वापर; राऊत यांचा गंभीर आरोप

| Updated on: Jun 03, 2022 | 4:10 PM

Rajya Sabha Election: जसं केंद्रात तुमचे सरकार आहे, तसे राज्यात आमचे सरकार आहे. मुख्यमंत्री, आमदार आणि आमचा चांगला समन्वय आहे. राजकीय पक्षाच्या आमदारांना मत दाखवायचे असते. बाकी लढाई अपक्ष आणि छोट्या पक्षांशी आहे.

Rajya Sabha Election: महाविकास आघाडीचे आमदार फोडण्याचे काम सुरू, केंद्रीय तपास यंत्रणांचाही वापर; राऊत यांचा गंभीर आरोप
महाविकास आघाडीचे आमदार फोडण्याचे काम सुरू, केंद्रीय तपास यंत्रणांचाही वापर; राऊत यांचा गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha election) बिनविरोध होणार की नाही याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना आणि भाजपने (bjp) आपला अतिरिक्त उमेदवार मागे न घेतल्याने ही निवडणूक होणार आहे. येत्या 10 जून रोजी ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेची निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट होताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सर्व अपक्ष आमदार महाविकास आघाडीशी (mahavikas agahdi) जोडले गेले आहेत. आता या आमदारांना फोडण्याचे, त्यांना फूस लावण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापरही सुरू झाला आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही उमेदवार मागे घेणार आहोत, अशा चर्चा कुठून सुरू झाल्या? याचे सूत्रधार कोण आहेत? आम्हाला माहीत आहे. आता चर्चा थांबल्या आहेत. आमचे उमेदवार रिंगणात आहेत. निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागणार आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. जसं केंद्रात तुमचे सरकार आहे, तसे राज्यात आमचे सरकार आहे. मुख्यमंत्री, आमदार आणि आमचा चांगला समन्वय आहे. राजकीय पक्षाच्या आमदारांना मत दाखवायचे असते. बाकी लढाई अपक्ष आणि छोट्या पक्षांशी आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची विकास कामं केली आहेत. हे सर्व आमदार महाविकास आघाडी सोबत जोडले गेले आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

चर्चा झाली, पण निष्फळ

दरम्यान, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यांना राज्यसभेचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. तसेच त्या बदल्यात विधान परिषदेसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, भाजपनेही हाच प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांना दिला. भाजपकडूनही आपल्याला अशीच ऑफर दिली जाईल याची अपेक्षाही नसताना अनपेक्षितपणे आलेल्या ऑफरमुळे आघाडीचे नेतेही संभ्रमात पडले. त्यानंतर आपआपल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचं ठरलं.

उमेदवारी अर्ज मागे घेतलाच नाही

दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. तीन वाजेपर्यंत चित्रं स्पष्ट होईल असं आघाडीचे नेते सांगत होते. मात्र, 3 वाजून गेल्यानंतरही भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यसभेवर कोण कोण जाणार हे येत्या 10 जून रोजीच स्पष्ट होणार आहे.