मुंबई महापालिका निवडणूक कधी? आशिष शेलार बोलता बोलता महिनाही सांगून गेले; ‘मिशन 151’चीही घोषणा

| Updated on: May 18, 2023 | 8:30 AM

भाजपच्या काल झालेल्या मेळाव्यात मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. यावेळी महापालिकेच्या 151 जागा जिंकण्याचं टार्गेटही ठेवण्यात आलं आहे.

मुंबई महापालिका निवडणूक कधी? आशिष शेलार बोलता बोलता महिनाही सांगून गेले; मिशन 151चीही घोषणा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार? हीच सध्या सर्वच राजकीय पक्षात चर्चा आहे. काहींच्या मते महापालिका निवडणुका कधीही होऊ शकतात. तर काहींच्या मते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतरच महापालिका निवडणुका होणार आहेत. मात्र, निवडणुकी नक्की कधी होणार हे राज्य सरकारकडून कोणीही अधिकृतपणे सांगू शकलेलं नाही. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात असतानाच एक मोठी बातमी आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपच्या कार्यक्रमात महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचं सूतोवाच केलं आहे. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचेही आदेश दिले आहेत. शेलार बोलता बोलता निवडणुकीबद्दल बोलून गेले. पण त्यामुळे आता महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचा कयास वर्तवला जात आहे.

भाजपने विलेपार्ले येथे आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मेळाव्याला मार्गदर्शन केलं. यावेळी आशिष शेलार यांनी हे सूतोवाच केलं. येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक लागली तर आपल्याकडे फक्त 120 दिवस उरतात. गेल्या निवडणुकीत आपण 82 जागांवर थांबलो होतो. आता काहीही करायचं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आरपीआयला सोबत घेऊन आपल्याला 151 जागा जिंकायच्याच आहेत, असं सांगतानाच आशिष शेलार यांनी सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

हे सुद्धा वाचा

सरदारासारखं लढा

ज्या प्रकार उद्धवजींच्या शिवसेनेनं भ्रष्टाचार केला ते आपल्याला माहीत आहे. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. महाराज युद्धाला जाताना सगळी योजना करायचे. एक एक सरदार त्यावेळी महाराजांचं आपापल्या क्षेत्रात सफलता मिळवत असायचा. तान्हाजी, बहिर्जी… याच मावळ्यांच्यासाथीने महाराजांनी मुघलांना पळवून लावलं. छत्रपतींसोबत जसे सरदार होते तसे आमच्यासाठी तुम्ही कार्यकर्ते आमचे सरदार आहात, कोकण, राजस्थानी, बिहार आघाडी, युवा मोर्चा…सर्वच आपापल्या क्षेत्रात तुम्ही भाजपचे सरदार आहात. मराठी तर आपल्यासोबत आहेतच. पण अन्य पक्षातील एकही मराठी कार्यकर्ता बाहेर सोडायचा नाही, असं आवाहन शेलार यांनी केलं.

त्यांचा जीव महापालिकेत

राजाचा जीव जसा पोपटावर होता तसा यांचा जीव मुंबई महापालिकेत आहे. यांच्याकडून पालिका आपल्याला काढून घ्यायची आहे. पालिकेला कुरण करून ठेवलं आहे. आता आपण काम करत आहोत, तर हे लोक म्हणत आहेत की, पैसे आपण संपवत आहोत. मुंबई पालिका आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी तयारी करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.