मुंबई : ऐन गणेशोत्सव (Ganpati Festival) तोंडावर आलेला असताना आता मुंबईकरांच्या (Mumbai City News) चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आलीय. मुंबईच्या किनाऱ्यावर खतरनाक समजले जाणारे ब्लू बॉटल जेलिफिश (Blue Bottle Jellyfish) आढलून आले आहेत. या जेलिफिशच्या संपर्कात आल्यास किंवा या जेलिफिशने चावा घेतल्यास जळजळ होणं, श्वास घेण्यास अडचणी येणं, अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे आतापासूनच मुंबईच्या समुद्र किनारी भागात पालिकेकडून सतर्कता बाळगली जाते आहे. मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी म्हटलंय की गणेशोत्सव काळात समुद्रकिनारी भागात जेलिफिशचा धोका लक्षात घेता प्रथमोपचार आणि औषधांची सोय करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे किनारी भागात स्वयंसेवकही तैनात करण्यात येणार असून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असं पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय. त्या अनुशंगाने सर्व ती काळजी घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं हर्षद काळे यांनी म्हटलंय. पण ब्लू बॉटल जेलिफिश आढळल्यामुळे लोकांनी समुद्रकिनारी भागात काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
गणेशोत्सव काळात बाप्पाच्या विसर्जनासाठी अनेक मुंबईकर हे समुद्रकिनारी जात असतात. त्यावेळी उत्साहाच्या भरात दुर्लक्ष होऊन जेलिफिशच्या संपर्कात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेकडून विशेष आवाहनही केलं जातंय. गेल्या काही वर्षात सातत्यानं मुंबईच्या किनारी भागात जेलिफिश आढळून येत आहेत. जेलिफिशच्या संपर्कात आल्यास असद्य वेदना होतात. तसंच ही जेलिफिश विषारी असते. यामुळे श्वासही घेण्यास अडचण येते. गळा किंवा घसा सूजणं, हृदयरोज आणि श्वसनात अडथळे येणं, यांसारखे गंभीर परिणाम ब्लू बॉटल जेलिफिशच्या संपर्कात येणाऱ्या होऊ शकतात, असं जाणकार सांगतात. त्यामुळे वेळीच धोका ओळखून काळजी घ्यावी, असं आवाहन केलं जातंय.
#WATCH Jellyfish washed ashore on Mumbai’s Juhu Beach, tarballs also accumulate along the coast pic.twitter.com/a2AQBihxlO
— ANI (@ANI) July 24, 2022
जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसात जुहू समुद्र किनाऱ्यावर जेलिफिश आणि टारबॉल आढळून आले होते. त्यानंतर किनारी भागात लाईफगार्ड्स यांना तैनात करण्यात आलं होतं. या लाईफगार्ड्स यांना विषारी जेलिफिशपासून समुद्रकिनाऱ्याला आणि किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. जेलिफिशने डसल्यास त्यातून होणाऱ्या वेदना आणि त्रास हे प्रचंड असून यामुळे अनेक आजार होऊन जीवही जाण्याची भीती असते.