
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची आणि नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटाची महापौरपदाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी ठाकरे गट महापौर देणार की नाही, याबद्दलही सूचक विधान केले.
किशोरी पेडणकेर यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गट मुंबईचा महापौर देणार की नाही, याबद्दल भाष्य केले. आता मराठी महापौर दिला आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणित मान्य असतात आणि आम्ही ती मान्य केलेली आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. यावेळी त्यांनी महापौरांच्या निवडीचा मार्ग मोकळा असल्याचे संकेत दिले आहेत.
किशोरी पेडणेकर यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. २०२२ मध्ये जी काही लढाई सुरू होती. त्या संघर्षातही बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेलं मराठी माणसाचं झाड आजही मुंबईत ताठ मानेने उभं आहे. बाळासाहेबांच्या नावावर मिळालेला जनादेश कोण कशासाठी वापरतंय, हे जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आमची लढाई ही नेहमीच मराठी माणसाच्या अस्मितेसाठी होती आणि ती कायम राहील, असे किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी त्यांनी महापौरपदासाठी उमेदवार देण्याबाबत थेट भाष्य न करता सक्षम विरोधी पक्ष होण्यावर भर दिला. आता मुंबईला मराठी महापौर मिळणार आहे, त्याचे आम्ही स्वागतच करतो. लोकशाहीत आकड्यांचे महत्त्व आम्हाला ठाऊक आहे. यापूर्वी सत्तेत असतानाही आम्ही अनेकदा जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधी पक्षासारखी भूमिका बजावली आहे. आता अधिकृतपणे तीच जबाबदारी आम्ही पार पाडू. कोणताही दबाव किंवा अमिषाला बळी न पडता आमचा प्रत्येक नगरसेवक प्रभागातील प्रश्न सभागृहात मांडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी महापौर निवडणुकीबाबत केलेल्या सूचक विधानाचा संदर्भ देत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “राऊत साहेबांनी भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले आहेत. येणारा काळच ठरवेल की मुंबईच्या राजकारणाची दिशा काय असेल. मुंबईच्या भल्यासाठी जे जे करावे लागेल, त्यासाठी शिवसेना ठाकरे गट कटीबद्ध आहे, असे किशोर पेडणेकर यांनी सांगितले.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी महायुतीने आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून उपमहापौरपदी शिवसेना (शिंदे गट) कडून संजय घाडी यांची वर्णी लागली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. रितू तावडे या घाटकोपरमधून निवडून आल्या असून त्यांनी यापूर्वी शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.