Mumbai Local : मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली, जागोजागी लोकल खोळंबल्या, नेमकं काय घडलं?

मध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे सीएसटी कडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या २०-२५ मिनिटे उशिराने धावत आहेत. स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे काम करत आहे.

Mumbai Local : मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली, जागोजागी लोकल खोळंबल्या, नेमकं काय घडलं?
Central Railway
| Updated on: Jan 29, 2026 | 10:50 AM

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली मुंबई लोकलची वाहतूक सध्या कोलमडली आहे. मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे आज सकाळी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे कोलमडली आहे. कल्याण ते सीएसएमटी (CSMT) दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्णपणे कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून कल्याण ते सीएसएमटी (CSMT) दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्या दररोज २० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वेच्या या विस्कळीत वेळापत्रकाचा सर्वात मोठा फटका नोकरी करणाऱ्या वर्गाला बसत आहे. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मुंब्रा या भागातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून एकही दिवस गाड्या वेळेवर धावत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्यांचे नियोजन रेल्वेच्या दिरंगाईमुळे पूर्णपणे कोलमडते. अनेक कार्यालयांमध्ये सलग लेट मार्क लागल्यास पगार कपात केली जाते. काही वेळा कर्मचाऱ्याला घरी पाठवले जाते. रेल्वेच्या या गोंधळामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल

गेल्या वर्षभरापासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवासी त्रस्त आहेत. आजच्या बिघाडामुळे स्थानकांवर प्रवाशांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. गाड्या वेळेवर येत नसल्यामुळे येणारी प्रत्येक लोकल तुडुंब भरलेली असते. यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत असून महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

रेल्वे प्रशासन गाड्या वेळेवर चालवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. “आम्ही रोज वेळेवर घराबाहेर पडतो, पण रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे आम्ही वेळेत पोहोचू शकू की नाही, याची खात्री उरलेली नाही,” अशी भावना एका संतापलेल्या प्रवाशाने व्यक्त केली.

तांत्रिक बिघाडावर काम सुरु

सध्या रेल्वेचे तांत्रिक पथक या बिघाडावर काम करत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच गाड्या वेळेवर धावतील, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत ॲपवर वेळ तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.