ढगफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही, तळीये गावात कालच मदत पोहोचली होती: उद्धव ठाकरे

| Updated on: Jul 23, 2021 | 2:55 PM

CM Uddhav Thackeray | अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ढगफुटीचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही, तळीये गावात कालच मदत पोहोचली होती: उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: राज्यात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी (Rain) हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भातही भाष्य केले. तळीये गावात कालच प्रशासनाची मदत पोहोचली होती. त्यावेळी अनेक लोकांना वाचवण्यातही आले. मात्र, आतापर्यंतच्या माहितीनुसार या दुर्घटनेत 30 ते 32 लोक मृत्यूमुखी पडल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मी राज्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही काल मला दूरध्वनी आला होता. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या (NDRF) तुकड्या राज्यात पोहोचल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

‘ढगफुटी नेमकी कुठे होईल याचा अचूक अंदाज वर्तवता येत नाही’

ढगफुटीचा नेमका अंदाज कोणालाही वर्तवता येत नाही. त्यामुळे ढगफुटी नेमक्या कोणत्या भागात होईल, हे माहिती नसते. कोकणात अनेक भागांमध्ये पूरामुळे रस्ते खचले आहेत. एनडीआरएफच्या पथकांनाही त्याठिकाणी पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत. या सगळ्यातून मार्ग काढत पथके त्याठिकाणी पोहोचत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कोरोना आणि पुराचं दुहेरी संकट: ठाकरे

राज्यातील कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्याचठिकाणी पूर आला आहे. त्यामुळे सर्वप्रथम जीवितहानी होऊ न देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. पूर ओसरलेल्या भागात रोगराई पसरणार नाही, यासाठी त्याठिकाणी औषधे पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

संबंधित बातमी :

Raigad Talai Landslide: रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती, 19 तासानंतरही मदत नाही, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दरेकर संतापले

Raigad Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, तळई गावात भीषण दुर्घटना


(CM Uddhav Thackeray reaction on Taliye Village landslide)