उद्धव ठाकरे एकप्रकारे मोदींचं कामच पुढे नेतायत; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

| Updated on: Oct 13, 2020 | 10:19 AM

आरेतील जंगल वाचवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेला आहे.

उद्धव ठाकरे एकप्रकारे मोदींचं कामच पुढे नेतायत; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रोची कारशेड कांजूरला हलवून पर्यावरणाचे रक्षण केले आहे. ते एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. (Sanjay Raut taunts Devendra Fadnavis)

राज्य सरकारने मेट्रो-३ प्रकल्पाची आरे परिसरातील नियोजित कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपला टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी पर्यावरण रक्षणाची भाषा करतात. त्यांच्या कार्यकाळात गंगा शुद्धीकरण, सेव्ह टायगर आणि जंगल वाचवण्यासाठीचे इतर उपक्रम हाती घेण्यात आले.

त्यामुळे आरेतील जंगल वाचवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आरेतील जंगलाचे क्षेत्र 600 एकरावरुन 800 एकरापर्यंत वाढवले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेची कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपकडून प्रकल्पाचा खर्च आणि व्यवहार्यतेच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. कारशेड कांजूरला हलवल्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात प्रचंड मोठी वाढ होईल. तसेच प्रकल्प पूर्ण होण्यास विलंबही लागेल, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

‘बिहारमध्ये शिवसेना स्थानिक पक्षांची मोट बांधून निवडणूक लढवणार’
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकत्रित लढण्याचा कोणताही विचार नाही. त्याऐवजी शिवसेना बिहारमधील स्थानिक पक्षांशी युती करुन निवडणूक लढवण्याला प्राधान्य देईल. बिहारमधील नेते पप्पू यादव यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी लवकरच पाटण्याला जाणार आहे. त्यावेळी यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

तसेच बिहारमध्ये शिवसेना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निवडणूक लढवत आहे का, असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. मात्र, बिहारमध्ये शिवसेनेची तेवढी ताकद नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. परंतु, शिवसेना ४० ते ५० जागांवर निवडणूक लढवले, असे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

रोहित पवारांकडून अमित ठाकरेंच्या दिलदारपणाचं कौतुक, चंद्रकांत पाटलांना टोला

आरेतील कारशेड कांजूरला नेल्यास मेट्रोला पाच वर्षांचा विलंब आणि 5000 कोटींचा भुर्दंड- सोमय्या

स्पेशल रिपोर्ट : मेट्रो-3चं कारशेड रॉयल पाममध्ये होणार? भाजपकडून ठाकरे सरकारवर पुन्हा हल्ला

(Sanjay Raut taunts Devendra Fadnavis)