पुराला जबाबदार महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करा : नाना पटोले

| Updated on: Aug 09, 2019 | 6:17 PM

काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी खासदार नाना पटोले (Nana Patole) यांनी महापुराला जबाबदार असणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सरकारवर 302 चा (खूनाचा) गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पुराला जबाबदार महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करा : नाना पटोले
Follow us on

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला (Western Maharashtra) बसलेल्या पुराच्या (Flood) फटक्याला निसर्गाच्या कोपाइतकाच सरकार आणि प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार देखील जबाबदार आहे. हाच मुद्दा काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी खासदार नाना पटोले (Nana Patole) यांनी उचलून धरला आहे. तसेच या महापुराला जबाबदार असणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सरकारवर 302 चा (खूनाचा) गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी ते न्यायालयाचा दरवाजाही ठोठावणार असून सोमवारी (12 जुलै) यासाठी याचिका दाखल करणार आहेत.

नाना पटोले म्हणाले, “राज्यामध्ये विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात राज्यकर्त्यांचा हात आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात होते. आम्ही पुढाकार घेऊन मुख्य सचिवांना नोटीस दिली नसती, तर मुख्यमंत्री फडणवीस प्रचारातच असले असते. राज्याचे मंत्री पर्यटनाला गेल्याप्रमाणे सेल्फी काढत आहेत आणि महापूर ‘एन्जॉय’ करत आहेत.”

पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराला कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. त्यांच्या चुकीमुळं राज्यातील जनतेला फटका बसतो आहे. अलमट्टी धरणातून वेळीच विसर्ग झाला असता, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही पटोले यांनी नमूद केलं. तसेच सरकारने तातडीने या स्थितीला राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावे आणि मदत कार्य युद्ध पातळीवर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

‘कर्नाटकमधील अलमट्टी धरणाचा करार’

नाना पटोले म्हणाले, “अलमट्टी धरणाच्या करारानुसार ऑगस्टमध्ये या धरणात किती पाणी ठेवावे हे निश्चित करण्यात आलेलं आहे. 2005 मध्ये अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन मंत्री पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांनी या धरणाच्या व्यवस्थापनासाठी दोन अधिकारी बसवले. तसेच या धरणात ऑगस्टमध्ये 40 टक्के पाणीसाठा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 2005 मधील पुराच्या स्थितीत या भागात कुठलीही जीवितहानी झाली नाही.”

‘हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही मुख्यमंत्री प्रचारात फिरत होते’

हवामान खात्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस होऊन अशी परिस्थिती निर्माण होईल, अशा सुचना दिल्या होत्या. तरिही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस पंचतारांकित पक्षाच्या प्रचारात फिरत होते. म्हणून आम्ही सोमवारी (5 ऑगस्ट) मुख्य सचिवांना 2005 च्या आपत्ती निवारण कायद्यातील 60 ब प्रमाणे एक नोटीस दिली. त्या नोटीसच्या भीतीने मुख्यमंत्री आपला दौरा सोडून परत आले. मात्र, त्यातही घाईत एक तोकडा जीआर काढला. त्यात ज्यांच्या घरातील भांडे वाहून गेले त्यांना 500 ते 750 रुपये मदत देऊ असे सांगितले. सरकारने एका पीडित कुटुंबाला कमीत कमी 50 हजार रुपयांची मदत करावी आणि या परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, अशी मागणी पटोल यांनी केली.

‘फडणवीसांमध्ये दुसऱ्या बाजीरावाचे डीएनए आले का?’

पटोले म्हणाले, “दुसऱ्या बाजीरावाने मागास, ओबीसी, अल्पसंख्यांक, अठरापगड जातीतील लोकांवर अन्याय केला होता. आपण मुख्यमंत्री फडणवीस देखील या दुसऱ्या बाजीरावाप्रमाणे काम करत आहेत. त्यांनी 7 आणि 8 ऑगस्टचा काढलेल्या जीआरमध्ये केवळ ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनाच 400-500 रुपये आर्थिक मदत देऊ असं म्हटलं आहे. त्यामुळे जमीन नसलेल्या मागास, गरिब लोकांना मदत नाकारणाऱ्या फडणवीसांमध्ये देखील दुसऱ्या बाजीरावाचे डीएनए आले आहेत का हे तपासायची वेळ आली आहे. त्यांच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो.”

‘कर्नाटकच्या भाजप मुख्यमंत्र्यांनी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास नकार दिला’

पटोले पुढे म्हणाले, “महापुराच्या स्थितीतही कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अलमट्टी धरणातील पाणी सोडणार नाही, असं सांगितलं. अलमट्टी धरणाचं बॅक वॉटर ते सर्व सांगली जिल्ह्यात येतं. त्यात वरती कोयनेच्या पाण्याचा जो विसर्ग होतो तेही पाणी याच भागात येतं. त्यामुळे संपूर्ण सांगली शहर पाण्याखाली गेलं आहे. त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यावरही पडत आहे. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जीवितहानीची काळजी न करता मुद्दामहून दुर्लक्ष केलं. त्यांच्या कर्तव्यात त्यांनी कसूर केली. म्हणूनच महाराष्ट्रातील नागरिकांची जी जीवितहानी झाली, प्राणीहानी झाली त्याच्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच आमची भूमिका आहे.”

‘शिवसेनेला सत्तेचा सोस, जनता त्यांना जागा दाखवेल’

यावेळी नाना पटोले यांनी महापुराच्या स्थितीत शिवसेनेच्या पक्षप्रवेशालाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, “शिवसेनेला सत्तेचा एवढा सोस आला आहे की त्यांना काहीच कळत नाही. लोक पुरात असताना शिवसेनेला राजकारण सुचत आहे. लोक त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.”