विठुरायाच्या दर्शनाआधीच काळाचा घाला; भीषण अपघातात 3 महिला वारकरी जागीच ठार, मृतांची नावे आली समोर
jejuri accident : पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३ महिलांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे समोर आली आहे.

पुण्यातील सासवड-जेजुरी रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली. वारीतील एका ट्रकने धडक दिल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला. मृत महिला सर्व सांगलीच्या होत्या. अपघातात मृत पावलेल्या महिलांची नावे समोर आली आहेत. तिन्ही महिलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर ऐन आषाढी वारीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या मृत महिलांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत केली जाण्याची शक्यता आहे.
जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात जेजुरीजवळ वारकरी महिलांचा अपघात झाला. अपघातात तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बालाजी एकनाथ डक असे ट्रक चालकाचे नाव आहे. हा ट्रक चालक हा नांदेडचा राहणारा आहे. नांदेडच्या ताठे महाराज भोशीकर या दिंडीचा ट्रक आहे. तर या अपघातातील मृतांची नावे देखील समोर आली आहेत.
मृतांचे नावे आली समोर
1) नंदा पवार वय 60 वर्षे राहणार – कवलापूर तालुका मिरज, जिल्हा सांगली
2) माधवी राजाराम सलगरे, वय 55 वर्षे राहणार – मालगाव तालुका मिरज, जिल्हा सांगली
3) राजश्री शंकर भोसले वय 55 वर्ष राहणार – कसबे डिग्रज तालुका मिरज, जिल्हा सांगली
दुर्घटनेवर संजय शिरसाट काय म्हणाले?
जेजुरीजवळील झालेल्या अपघातावर मंत्री संजय शिरसाट म्हणाले, ‘ जो अपघात झाला दुर्दैवी आहे, तीन महिलांचा मृत्यू झाला असून 6 जखमी आहे. अपघात घडू नयेत, याची काळजी घेतली जात आहे. सुनेत्रा पवार घटनास्थळी पोहचल्या आहेत. शासकीय मदत केली जाईल, उपाचर केले पाहिजे. वारकऱ्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे, अशा घटनामुळे दुःखद घटना समोर येतात’.
अपघातानंतर सुनेत्रा पवारांकडून प्रशासनाला तात्काळ सूचना
सुनेत्रा पवार यांनी सासवड–जेजुरी मार्गावर झालेल्या दुर्घटनेवर भाष्य करताना म्हटलं की, जेजुरीजवळील घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे ट्विट उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केलं. सासवड-जेजुरी मार्गावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देत जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. त्यानंतर पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच जखमींवर तातडीने, वैद्यकीय उपचार करण्यात यावेत, त्याचबरोबर आवश्यक ती सर्व मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. राज्यसरकार मृतांच्या कुटुंबियांसह व जखमी वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तुम्हाला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही देखील सुनेत्रा पवार यांनी दिली.
