आनंदाची बातमी! राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरणार; टास्क फोर्सचा अंदाज

| Updated on: Apr 28, 2021 | 1:16 PM

ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असेही या तज्ज्ञांनी सांगितले. | Coronavirus Second wave

आनंदाची बातमी! राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरणार; टास्क फोर्सचा अंदाज
मुंबईतील डबलिंग रेट 55 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.
Follow us on

मुंबई: राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे. (Coronavirus Second wave in Maharashtra may decrease in first week of May)

मात्र, ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असेही या तज्ज्ञांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरु राहिले पाहिजे. पहिले सहा तास वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण व्हावे. त्यानंतर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल, असेही ‘टास्क फोर्स’च्या डॉक्टरांनी सांगितले.

लॉकडाऊन इफेक्ट, पुण्यात सलग आठव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येत घट

कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल 15 दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 हजारांच्या खाली आहे. पुणे (Pune Corona Patients) शहरातही हा बदल बघायला मिळाला आहे. एकटच्या पुणे शहरात सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं बघायला मिळालं आहे (Pune Corona Patients). पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 48,700 नव्या रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 48,700 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 71,736 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. गेल्या सहा दिवसांत राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

संबंधित बातम्या:

लॉकडाऊन इफेक्ट, पुण्यात सलग आठव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येत घट

Mumbai Corona : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णांमध्ये घट सुरुच, नव्या रुग्णांचा आकडा 4 हजाराच्या खाली

Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?

(Coronavirus Second wave in Maharashtra may decrease in first week of May)