मुंबई : मुंबई महानगराला वातावरणीय बदलाविरोधात सक्षम बनविण्यासाठी मुंबई वातावरण कृती आराखडा बनविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये नागरिकांना सूचना, शिफारशी नोंदविता याव्यात, यासाठी mcap.mcgm.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत 200 सूचना आणि प्रतिसाद प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. अधिकाधिक नागरिक व तज्ज्ञांना सूचना पाठविणे शक्य व्हावे म्हणून नागरिकांच्या विनंतीनुसार या सुविधेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई वातावरण कृती आराखडा (Mumbai Climate Action Plan) बनविण्यासह त्यासाठीच्या संकेतस्थळाचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी पार पडला. यानंतर, वातावरण बदल संदर्भातील तज्ज्ञ व भागधारकांशी सल्लामसलत करुन आराखडा बनविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. सध्याची कोविड संसर्गाची स्थिती लक्षात घेता, दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) द्वारे ऑनलाईन चर्चासत्रे आयोजित करुन तज्ज्ञांसह नागरिकांशी चर्चा करण्यात आली आहे.
आराखड्याबाबत तज्ज्ञ व्यक्ती तसेच नागरिक यांना त्यांच्या सूचना, शिफारशी mcap.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून पाठविण्यासाठी 20 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार 200 प्रतिसाद प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. तथापि, अधिकाधिक नागरिक, तज्ज्ञ, संबंधित क्षेत्रातील संस्था यांना सूचना पाठविता याव्यात म्हणून या सुविधेस मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्याचा सकारात्मक विचार करुन प्रशासनाने https://mcap.mcgm.gov.in/talk-to-us/. या लिंकवर प्रतिसाद नोंदविण्यास मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान, इच्छुक विषय तज्ज्ञ आणि नागरिकांनी संकेतस्थळावर वातावरण बदलाशी निगडित सूचना, शिफारशी पाठवाव्यात. सर्व संबंधित विषय तज्ज्ञ, नागरिक, भागधारक घटकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबई वातावरण कृती आराखडा अंतर्गत संकल्पना आधारीत उपाय हे नोव्हेंबर 2021 पर्यंत म्हणजेच संयुक्त राष्ट्रे वातावरण बदल परिषद (युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स – COP26) आयोजन कालावधीच्या आसपास तयार होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :
कोस्टल रोडच्या कामावर 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा ‘तवंग’, आशिष शेलारांचा गंभीर आरोप
अनिल परबांनी असं काय केलं की, रामदास कदम लोकायुक्तांच्या कारवाईवर व्हेरी गुड… व्हेरी गुड म्हणतायत?
बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा… राजू वाघमारे आक्रमक
सप्टेंबरमध्ये मारुती कंपनीला भारी नुकसान, टाटा मोटर्सच्या विक्रीत 26 टक्क्यांची वाढ; जाणून घ्या विविध वाहन उत्पादक कंपन्यांची स्थितीhttps://t.co/YAw333YY9b#Maruti |#TataMotors |#Selling |#Loss |#September
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 2, 2021