बीडीडी पुनर्विकासाचं काम कुणाच्या काळातलं? फडणवीस म्हणतात भूमिपूजन सुद्धा झाले होते !

| Updated on: Aug 01, 2021 | 5:14 PM

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास कामांच्या सर्व परवानग्या घेऊन आमच्या काळात त्याचं भूमिपूजनही झालेलं आहे, असा दावा फडणवीस यांनी केलाय.

बीडीडी पुनर्विकासाचं काम कुणाच्या काळातलं? फडणवीस म्हणतात भूमिपूजन सुद्धा झाले होते !
देवेद्र फडणवीस, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (1 ऑगस्ट) मुंबईत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाचं उद्घाटन झालं. त्यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास कामांच्या सर्व परवानग्या घेऊन आमच्या काळात त्याचं भूमिपूजनही झालेलं आहे, असा दावा फडणवीस यांनी केलाय. त्यांनी याबाबत ट्विट करुन आपलं मत व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार करून, सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) सुद्धा आमच्या काळात दिले होते आणि भूमिपूजन सुद्धा झाले होते. आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे.”

आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. वर्ष 1920 ते 1924 या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉईड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडींची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका

वरळी येथे सर्वाधिक म्हणजे 121 चाळी असून, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + 40 मजल्यांच्या 33 पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहेत. रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झालेय. प्रत्येक सदनिकांमध्ये 800 बाय 800 मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार आहे.

पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची सदनिका विनामूल्य मिळणार

शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटांच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून 500 चौरस फुटांची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे फोटो बीडीडीच्या देव्हाऱ्यात, बीएमसी निवडणुकीत फायदा होणार का?

आजि सोनियाचा दिनु, संकटातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हिम्मत दाखवली, पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

वरळी BDD चाळींचा कायापालट होणार, किती फुटांचं घर आणि कधीपर्यंत प्रकल्प पूर्ण?, एका क्लिकवर सर्व माहिती

व्हिडीओ पाहा :

Devendra Fadnavis comment of inauguration of BDD Chawl redevelopment