आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य

| Updated on: Dec 23, 2021 | 12:49 PM

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचे आज विधानसभेत पडसाद उमटले. या प्रकरणात कर्नाटक सरकारकडून सहकार्य मिळत नसेल तर मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करेल.

आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य
Follow us on

मुंबई: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचे आज विधानसभेत पडसाद उमटले. या प्रकरणात कर्नाटक सरकारकडून सहकार्य मिळत नसेल तर मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी आदित्य ठाकरे यांच्या धमकी प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

त्यांना ठेचलंच पाहिजे

सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांकडे विधानसभेचं लक्ष वेधलं. आदित्य ठाकरेंना धमकी आली त्याचा आम्ही निषेध करतो. मंत्र्यांना कोणी धमकी देत असेल तर त्याला ठेचलं पाहिजे. या गंभीर प्रकरणाला राजकीय करण्याचा प्रयत्न सुनील प्रभू यांनी केला. दोन प्रकरणातील आरोपी महाराष्ट्रातील होते. दोन हत्या महाराष्ट्रात झाल्या. दोन कर्नाटकात झाल्या. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या कर्नाटकात झाली. गुन्हेगार हे गुन्हेगार असतात त्याला राजकीय वळण देता कामा नये. ट्विटरवर जे ट्रेंडिग झालं. त्याची चौकशी करा माझी मागणी आहे, असं फडणवीस म्हणाले.

ठोस पुरावे असतील सनातनवर बंदी घाला

रजा अकादमीचीही चौकशी करा. दोन वर्षापासून तुमचं सरकार आहे. तुमचा एवढा प्रॉब्लेम आहेत तर सनातनवर दोन वर्षात बंदी का घातली नाही. या प्रकरणाला फाटे फोडू नका. मुद्दा एवढाच आहे. आदित्य ठाकरेंना धमकी आली आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी. सनातनवर बंदी घालण्याच्या 2012मध्ये पहिल्यांदा तुमचं सरकार असताना प्रस्ताव आला. पण तुमचं सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवू शकलं नाही. कारण तुम्ही सनातन विरोधात कोणतेही ठोस पुरावे देऊ शकले नाहीत. राज्य जेव्हा यूएपीएच्या अंतर्गत केंद्राकडे पुरावे सादर करत तरच एखाद्या संघटनेवर बंदी घातली जाते. 2013मध्ये हत्या झाल्यानंतर पुन्हा सनातनवर बंदी घालण्याची घोषणा झाली. पण ठोस पुरावे मिळाले नाही. त्यामुळे तुम्हाला सनातनवर बंदी घालता आली नाही. दोन वर्ष आता तुम्ही सत्तेत आहात. तुमच्याकडे ठोस पुरावे असतील तर पाठवा ना, असं आव्हानच त्यांनी सरकारला दिलं.

कुणाचंही समर्थन करणार नाही

सनातन असो की रजा अकादमी असो दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या कोणत्याही संघटनेचं आम्ही समर्थन करणार नाही. हा एक मर्यादित महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी आली. त्यामुळे कर्नाटकमधून सरकारला सहकार्य मिळत नसेल तर मी स्वत: कर्नाटकात जाऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांना भेटून सहकार्य मिळवेन. कारण हा गंभीर विषय आहे. त्याला राजकीय करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

एसआयटी चौकशी करू

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. राज्य स्तरावर एसआयटीची स्थापना करून अशा प्रकारच्या धमक्यांवर एक सर्वंकष धोरण तयार करू, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

VIDEO: आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा; नेमकं काय घडलं विधानभवनाच्या पायरीवर?

VIDEO: हिंमत असेल तर अविश्वास ठरावा आणाच, तुमच्यासोबत कोण ते तरी कळेल?; नवाब मलिकांचा टोला

शाळेची फी भरलेल्यांना हिरवे कार्ड, अन्यथा रेड कार्ड, विद्यार्थ्यांत चक्क भेदभाव? औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलचा प्रताप