बारमध्ये गर्दी चालते, कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको; फडणवीस संतापले

| Updated on: Jun 22, 2021 | 2:21 PM

राज्य सरकारने दोनच दिवसाचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले आहेत. (Devendra Fadnavis)

बारमध्ये गर्दी चालते, कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको; फडणवीस संतापले
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई: राज्य सरकारने दोनच दिवसाचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले आहेत. बारमध्ये गर्दी चालते, पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनालाही गर्दी चालते, मग अधिवेशन का नको?, असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अधिवेशन आल्यावरच कोरोनाचं कारण कसं दिलं जातं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Devendra Fadnavis slams Mahavikas aghadi over Maharashtra Legislative assembly session)

अधिवेशनाची तारीख ठरवण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, केवळ 5 आणि 6 जुलैला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय अधिवेशनात प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी न घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी या निर्णयाला विरोध करत सभात्याग केला. त्यानंतर मीडियासमोर येऊन त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा कोरोना वाढल्याच्या बातम्या येतात किंवा राज्य सरकारकडून तशा भूमिका मांडल्या जातात. कोरोनाचा बहाना पुढे घेऊन राज्याचं अधिवेशनच घेऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे. केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

लोकशाही बासनात गुंडाळली जातेय

फक्त दोन दिवसाच्या अधिवेशनात राज्यातल्या प्रश्नांवर चर्चा कशी करणार? विशेष अधिवेशन करण्याची गरज असताना आहे ते अधिवेशनही घेणार नाही अशीच सरकारची भूमिका आहे. लोकशाही बासनात गुंडाळायची सरकारची कार्यपद्धती आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काहीच भूमिका नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर काहीच भूमिका नाही. त्यासाठी विशेष अधिवेशन नाही. संसदीय लोकशाहीत ही गंभीर बाब आहे. अर्निबंध प्रशासन आणि मंत्री यांच्यावर प्रश्न विचारायचेच नाहीत का?, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

शांत बसणार नाही

एकीकडे राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालय उद्घाटन चालतं. मग अधिवेशन का नाही, असा प्रश्न करत विरोधी पक्षाने विधीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. लोकशाहीची थट्टा सुरु असल्याने आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असं सांगतानाच दोन दिवसाचं अधिवेशन म्हणजे सामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आम्ही याबाबत रस्त्यावर उतरून जाब विचारू. आम्ही काय करणार हे लवकरच सांगू पण शांत बसणार नाही. लोकशाहीच्या संकेताला हरताळ फासला जात असेल तर आम्हालाच जनतेचा आवाज बनावा लागेल, असंही ते म्हणाले. (Devendra Fadnavis slams Mahavikas aghadi over Maharashtra Legislative assembly session)

 

संबंधित बातम्या:

तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? आक्रमक फडणवीस बैठकीतून बाहेर

सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

नाना पटोलेंच्या ‘एकला चलो रे’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?; आघाडीत अस्वस्थता वाढली

(Devendra Fadnavis slams Mahavikas aghadi over Maharashtra Legislative assembly session)