Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेसोबत काँग्रेसचेही मोठे नुकसान, भाजपा, राष्ट्रवादीच्या पदरात काय.? वाचा सविस्तर

| Updated on: Jun 24, 2022 | 4:35 PM

जर शिंदे यांचे बंड यशस्वी झाले तर केवळ शिवसेनेलाच याचा फटका बसणार नाही, राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या इतर पक्षांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपाची ताकद वाढताना दिसत असून, यातून नवी समीकरणे आणि नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेसोबत काँग्रेसचेही मोठे नुकसान, भाजपा, राष्ट्रवादीच्या पदरात काय.? वाचा सविस्तर
Uddhav and Sonia Gandhi
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली – राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा अंत काय होईल, याची कल्पना आत्ता कुणालाच नाही. उद्धव ठाकरे सरकार वाचेल की पडेल, या प्रश्नाचे उत्तर सगळेच जण शोधत आहेत. मात्र त्याही पेक्षा महत्त्वाचे हे आहे की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या या  बंडामुळे आगामी काळातील राज्यातले राजकारणार समूळ बदलण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात एकनाथ शिंदे यांचे बंड हे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे बंड असल्याचे सध्यातरी दिसते आहे. जर शिंदे यांचे बंड यशस्वी झाले तर केवळ शिवसेनेलाच (Shivsena)याचा फटका बसणार नाही, राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या इतर पक्षांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपाची (BJP)ताकद वाढताना दिसत असून, यातून नवी समीकरणे आणि नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

आता शिवसेना कुणाची?

हा सर्वात मोठा प्रश्न येत्या काही काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंकडे पुरेसे संख्याबळ सद्यस्थितीत दिसते आहे. त्यांनी कायदेशीर प्रक्रियेतून स्वतंत्र गटाला मान्यता मिळवली, तर अशा स्थितीत राज्यात शिवसेना नेमकी कुणाची यावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आगामी काळात वाद होण्य़ाची शक्यता आहे. शिंदे आणि भाजपाने एकत्र येत आकड्यांचा खेळ जमवला, तर आगामी काळात राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत वेगळेच चित्र पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. शिंदे आणि भाजपाला संख्याबळ जमवता आले नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

उद्धव यांची ताकद कमी होणार?

फुटणाऱ्या आमदारांची आणि खासदारांची संख्या पाहता, राज्यातील शिवसेना पक्ष अधिक फुटण्याची आता भीती आहे. ही फूट किती मोठी असेल यावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पुढची ताकद आता ठरणार आहे. शिवसेनेवरील त्यांचे नियंत्रण संपणार का ही भीती आहे. शिंदे यांच्या गटाला शिवसेना अशी मान्यता मिळाली तर उद्धव यांची शिवसेना ठाकरेंची शिवसेना राहिल, मात्र त्याची ताकद कमी झालेली असेल. भुजबळ, राणे आणि राज ठाकरेंच्या बंडांनंतर यावेळी ती अधिक कमकुत स्वरुपात समोर येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाची इच्छापूर्ती, ताकद वाढणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपाची मूळ इच्छा पूर्ण झाल्याचे मानण्यात येते आहे. राज्यात शिवसेनेला मोठा धडा शिकवण्याचा भाजपाचा प्रयत्न सध्यातरी यशस्वी झालेला दिसतो आहे. राज्यात भाजपाचा व्होट बँकेतील प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेत बंड घडवून आणून शिवसेना पक्षावर आणि मतदारांवर मानसिक दबाव निर्माण झाला आहे. अशा स्थितीत शिंदे जर भाजपासोबत येतील अशी स्थिती आहे, अशा काळात भाजपाची राज्यातील ताकद अधिक होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे फारसे नुकसान नाही

या सगळ्यात भाजपासोबत फायदा होताना दिसतोय तो राष्ट्रवादी काँग्रेसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हे त्यांच्यासोबतच आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पक्ष जरी विरोधी पक्षांत गेला. तरी विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. गेल्या अडीच वर्षात सत्तेचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीने करुन घेतल्याचा आरोप करण्यात येतो आहे. यातून त्यांची राज्यातील संघटनात्मक स्थितीही चांगल्या अवस्थेत दिसते आहे. या सगळ्या संकटात उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्याच्या भूमिकेतही राष्ट्रवादी दिसते आहे. हे पुढे कसे वळण घेईल, याचा अंदाज तूर्तास तरी नाही.

सर्वाधिक फटका काँग्रेसला बसणार

राज्यात शिवसेनेनंतर जर कुणाला फटका बसणार असेल तर तो काँग्रेस पक्षाला बसणार आहे. देशातील महाराष्ट्र या मोठ्या राज्यात सध्या काँग्रेस सत्तेत आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्र सत्तेसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सत्ता गेली तर काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरही नुकसान होणार आहे. केंद्रीय नेतृत्वही कमकुवत असल्याने आगामी काळात काँग्रेसमध्येही मोठा फाटाफूट बघायला मिळण्याची शक्यता आहे. विधान परिषद निकालात याची चुणूकही पाहायला मिळालेली आहे.