ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक; मुख्यमंत्र्यांकडून मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण

| Updated on: Aug 13, 2021 | 8:12 PM

येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबवला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक; मुख्यमंत्र्यांकडून मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण
Follow us on

मुंबई : येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबवला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. येत्या स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे “ई-पीक पाहणी” प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. (E-Crop Survey Project Guide for Country, Online Launch of Mobile App by CM)

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ऑनलाईन पध्दतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुख्य सचिव सीतराम कुंटे, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जमाबंदी आयुक्त व संचालक निरंजन सुधांशू, टाटा ट्रस्टचे मुख्य सल्लागार जयंतकुमार बांठिया, टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहन, ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप, यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, काही वर्षांपूर्वी शेतकऱ्याला स्वत:चा सातबारा पहायला मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असे, पण आज शेतकऱ्यांना आपला सातबारा मोबाईलमध्ये पाहणे शक्य झाले आहे. काळाप्रमाणे बदलणे हा प्रकृतीचा नियम आहे असे आपण म्हणतो, मग बदलत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबरोबरच त्यांना सोप्या आणि सुलभ पध्दतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणे, पिकांची माहिती मिळवून देणे, यावर भर देत आहोत, याचा आनंद वाटतो. कोणताही नवीन प्रयोग करताना यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण सर्वजण सांघिक प्रयत्न करतो. आपण सर्वांनी सांघिक प्रयत्न केल्यानेच आता आपल्या शेतकरी बांधवांचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.

हमीभाव नाही तर हमखास भाव मिळेल यावर भर

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आज दररोज हवामानात बदल होतो आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. ई पिक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आनंद आहे.

विकेल ते पिकेल ही संकल्पना राज्यभरात राबवित असताना आपापल्या जिल्हयाचे वैशिष्टय ओळखून एक जिल्हा एक पीक असा ब्रँड तयार करणे आवश्यक आहे. तरच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळेल. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजी पाला अधिक दिवस कसा टिकवता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीमध्ये काळाच्या पुढे जाणारे प्रयत्न केले, तसेच आताही शेतकऱ्यांना नवीन गोष्टी आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांचे जीवन सोपे आणि सुलभ करण्यावर भर देणे आवश्यक आहे.

इतर बातम्या

मोदी सरकारच्या दबावामुळेच ट्विटरकडून काँग्रेससह पक्षाच्या नेत्यांचे अकाऊंट्स बंद; नाना पटोलेंचा आरोप

पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?, चित्रा वाघ भडकल्या; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ इशारा

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?

(E-Crop Survey Project Guide for Country, Online Launch of Mobile App by CM)