ST Employees | एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा दिलासा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऐन दिवाळीत पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना खूश करणारा निर्णय घेतलाय.

ST Employees | एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा दिलासा
Chetan Patil | Updated on: Sep 08, 2023 | 6:59 PM

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव सणाच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यात नुकतंच श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालाचा उत्साह होता. त्यानंतर राज्यात लवकरच गणेशोत्सवाचा उत्साह असणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक नागरीक कोकणात आपल्या गावी जातात. या काळात एसटी कर्मचारी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. एसटी कर्मचारी नियमितपणे प्रवाशांसाठी तत्पर असतात. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांचा विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 34 टक्क्यांवरुन 38 टक्क्यांवर येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी महागाई भत्ता वाढवण्याच्या निर्णयाला आज मान्यता दिलीय. महागाई भत्ता वाढवल्याने सरकारवर 9 कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

90 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायदा होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 90 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता 38 टक्के इतकाच दिला जातोय. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, असा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केल्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचं मोठं आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी मोठं आंदोलन पुकारलं होतं. या कर्माचाऱ्यांनी पगारवाढीच्या मुख्य मागणीसह अनेक मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारलं होतं. जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ हे आंदोलन चाललं होतं. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. याशिवाय या आंदोलनामुळे गावं आणि तालुक्याचा संपर्क तुटला होता. तसेच या आंदोलनामुळे खासगी वाहनांचे भाव गगनाला पोहोचले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या कडक आंदोलनामुळे अखेर राज्य सरकारला पगारवाढीचा निर्णय घ्यावा लागला होता.

 

Follow Us