मंत्रालयातले कर्मचारी राज ठाकरेंच्या दरबारी

मुंबई : राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातले कर्मचारीही राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याचे दिसते आहे. ज्यांनी राज्यातल्या जनतेची कामं करावी, त्या कर्मचाऱ्यांनाच आता विविध मागण्यांसाठी लढावं लागतं आहे. मंत्रालयातील लॉटरी संचलनालयाच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. मंत्रालयात लॉटरी संचालन विभागातील कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या […]

मंत्रालयातले कर्मचारी राज ठाकरेंच्या दरबारी
फोटो सौजन्य - MNS Adhikrut चं ट्विटर हँडल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातले कर्मचारीही राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याचे दिसते आहे. ज्यांनी राज्यातल्या जनतेची कामं करावी, त्या कर्मचाऱ्यांनाच आता विविध मागण्यांसाठी लढावं लागतं आहे. मंत्रालयातील लॉटरी संचलनालयाच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपल्या समस्यांचा पाढाच वाचला.

मंत्रालयात लॉटरी संचालन विभागातील कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या विभागात हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. मात्र, कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याने कायम स्वरुपी घेतलं जात नाही, ही प्रमुख समस्या या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंसमोर मांडली.

लॉटरी संचालन विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश ‘मॅट’ने दिले असतानाही, राज्य सरकार मात्र आदेश अंमलात आणण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांचा आहे. तेच त्यांनी राज ठाकरेंच्या कानावर घातलं.

कामावर कायम करावं, या प्रमुख मागणीसह मंत्रालयातील या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्याही राज ठाकरेंना सांगितल्या. त्यानंतर राज ठाकरेंनी या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला की, या सर्व मागण्यांसाठी स्वत: पाठपुरावा करेन. राज ठाकरेंच्या आश्वासनाने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही आपल्यासोबत कुणी असल्याचा दिलासा मिळाला आहे.

खरंतर, राज ठाकरे यांचा विधानसभेत एकच आमदार आहे. मात्र, तरीही सत्तेबाहेर राहून, रस्त्यावरील आंदोलनांमधून सत्तेवर वचक ठेवण्याचं काम राज ठाकरे उत्तमपणे करतात, जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडून ते कसे सोडवायचे, हे त्यांना चांगले ठाऊक आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने त्यांनी थेट राज ठाकरेंना गाठून आपले म्हणणे मांडले.

आता मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न राज ठाकरे कसे हाताळतात, हे येत्या काळात कळेलच. मात्र, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्याच समस्या राज्य सरकार सोडवत नसल्याचेही या सर्व प्रकारातून समोर आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us