अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव, तब्बल 44जणांनी जीव गमावला

| Updated on: Oct 16, 2020 | 6:21 PM

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूंच तांडव पाहायला मिळालं. यामुळे 44 जणांना जीव गमवावा लागला आहे. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. (44 Person died in heavy rainfall)

अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव, तब्बल 44जणांनी जीव गमावला
Follow us on

मुंबई :अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल 44 जणांनी गमावला आहे. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. अतिवृष्टीदरम्यान पुणे विभागात 28 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरु आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला.  (44 Person died due to heavy rainfall in Maharashtra)

सोलापूरमध्ये सर्वाधिक 14 जणांचा मृत्यू

पुणे विभागात अतिवृष्टीमध्ये एकूण 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू सोलापूर जिल्ह्यात झाले आहेत. सोलापूरला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पंढरपूरमध्ये दोन दिवसापूर्वी चंद्रभागा नदी काठावर बांधकाम सुरु असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला.

तिकडे माढा येथील ओढ्यातून चारचाकी वाहून गेल्याची घटना घडली. यामध्ये तीन जण प्रवास करत होते.

सांगलीतही मृत्यूची नोंद

सांगली जिल्ह्यातदेखील 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सांगलीच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन 36 फुटापर्यंत पोहोचली होती. सांगलीत पावसाने कहर केल्यानं 90 मार्ग बंद करावे लागले होते.

पुणे, सातारा जिल्हा

पुणे जिल्ह्यात पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्यामुळं 4 जणांचा मृत्यू झाला तर साताऱ्यात एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुंळ 513 जनावरांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली माहिती

 

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू बीड जिल्ह्यात झाले आहेत.  औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली आकडेवारी :

मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये (3), जालना( 2), परभणी( 1), नांदेड( 2), बीड (5), लातूर (1) आणि उस्मानाबाद 2 जणांचा पावसादरम्यान  मृत्यू झाला आहे.

विदर्भात देखील अनेक ठिकाणी वीज पडल्याने जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना झालेल्या पावसामुळं कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानं आणि पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं सांगितलं आहे. राज्यात मुंबई-पुणे ते औरंगाबाद, सोलापूर-कोल्हापूर, वाशिम-हिंगोलीपर्यंत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. खरिप हंगामातील पिके काढण्याची कामं सुरु असताना पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या :

मुसळधार पावसानं वाहून गेला पूल, पावसाचं रौद्र रुप दाखवणारे भीषण PHOTOS

‘मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा’, स्वाभिमानी युवती आघाडीचा रास्तारोको

(44 Person died due to heavy rainfall in Maharashtra)