आता मतदारांनी आपल्या डोळ्यावर बांधलेली पट्टी काढावी, आणि राजकारण समजून घ्यावे; मनसेनं ठाकरे गटाला दुटप्पी ठरवलं

| Updated on: Jan 28, 2023 | 11:33 PM

उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते की, आम्ही या महाराष्ट्राला टोलमुक्ती देऊ मात्र ते म्हणत होते त्या टोलमुक्तीचे नेमके काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आता मतदारांनी आपल्या डोळ्यावर बांधलेली पट्टी काढावी, आणि राजकारण समजून घ्यावे; मनसेनं ठाकरे गटाला दुटप्पी ठरवलं
Follow us on

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाविकास आघाडीसह खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर मनसे नेता गजानन काळे यांनी पातळी सोडून टीका केली होती. तर आता त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी शिंदे गटावर मात्र बोलणे टाळले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी त्यांनी त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, मला सगळे माहिती आहे संजय राऊत नावाचा बाबा रोज सकाळी टिव्हीवर येत आसतो आणि राज्य सरकारवर टीका करत असतो.

तर यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर टीका करताना ती किंचित अशी युती झाली होती अशी खोचक टीकाही युतीवर करण्यात आली आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार भाजपचे आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, मला वाटले राष्ट्रवादी आक्रमक होईल मात्र यावर संजय राऊत आक्रमक होताना आपल्याला दिसले अशी टीकाही त्यांनी यावेळी खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटावर केली आहे. महाविकास आघाडीतील पक्ष रोज या सरकारला घटनाबाह्य सरकार म्हणून त्यांच्यावर टीका करतात.

आणि त्याच सरकारची जाहिरात मात्र सामनाच्या मुखपृष्टावर छापायला यांना चालते अशी टीका सामना वृत्तपत्रात छापलेल्या जाहिरातीवरून करण्यात आली आहे.

यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या राजकारणावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले राहुल नार्वेकर यांनी त्यांना वारंवार विनंती करूनही ते का आले नाहीत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते की, आम्ही या महाराष्ट्राला टोलमुक्ती देऊ मात्र ते म्हणत होते त्या टोलमुक्तीचे नेमके काय झाले असा सवालही त्यांनी यावेळी केला.

त्यामुळे आता मतदारांनी आपल्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी काढावी आणि होणारे राजकारण समजून घ्यावे. जो पैसा आला तो जनतेसाठी खर्च होतो का हेही पाहावे असा सल्लाही त्यांनी नागरिकांना यावेळी दिला आहे.