अटक,धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का?; आशिष शेलारांचा आघाडी सरकारला संतप्त सवाल

| Updated on: Sep 01, 2021 | 2:26 PM

दहीहंडी साजरी केली म्हणून अनेक गोविंदांची पोलिसांनी धरपकड आणि अटक केली आहे. या कारवाईवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. (govinda is not Osama Bin Laden; ashish shelar reply to cm uddhav thackeray)

अटक,धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का?; आशिष शेलारांचा आघाडी सरकारला संतप्त सवाल
आशिष शेलार
Follow us on

मुंबई: दहीहंडी साजरी केली म्हणून अनेक गोविंदांची पोलिसांनी धरपकड आणि अटक केली आहे. या कारवाईवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. अटक, धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. (govinda is not Osama Bin Laden; ashish shelar reply to cm uddhav thackeray)

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बलाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टीचा काल महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या. जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता. ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला, तेव्हा सचिन वाझे लादेन आहे काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. आज आमचा मुख्यमंत्र्यांनाही तोच सवाल आहे. अटक, धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहेत काय?, असा संतप्त सवाल शेलार यांनी केला. ज्या पद्धतीने गोविंदांच्या विरोधात बलाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा विक्रम

गेल्या दीड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने, ठाकरे सरकारने, सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. पावणे दोन वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धव ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

रेस्टॉरंट, पब, बारमधील गर्दीचे काय?

मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही, आमचा करोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले, राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय? आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय, केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का?, असा सवाल त्यांनी केला. केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला टेस्ट वाढवायला सांगितलं होतं. वाढवल्यात का टेस्ट? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी समप्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेचे आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या? केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही हे झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका. सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बादमें सरकार” तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि “पहिले मदिरालय बाद मे मंदिर!”, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

हिंदू सणांवरील आक्रमण बंद करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या बाजूने भाजपा आहे, पण निर्बंधांमध्ये वाटाघाटी करून निर्बंधाचा धंदा करण्याच्या सिलेक्टीव्ह कामामध्ये आम्ही बरोबर नाही. आम्ही त्या विरोधात आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, नियम नियमावली करून मंदिर उघडा. प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन, त्याचे नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदू सणांवरील आक्रमण बंद करा. एका विशिष्ट वर्गाची मतं मिळायला लागल्यापासून गेल्या तीन-चार वर्षांपासून शिवसेनेने हे काम सुरू केले आहे. याची सुरुवात बेहराम पाड्यापासून झाली आहे. या बेहराम पाड्यात शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आणि सर्वेमध्ये एका विशिष्ट वर्गाची मते मिळत आहेत असे दिसू लागल्यावर शिवसेनेने एका विशिष्ट वर्गाचे लांगुलचालन सुरु केले आहे. लालबाग, परळ आणि महाराष्ट्रातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्हाला तुमचे राजकारण लखलाभ. सामान्य जनतेसाठी आम्ही आवाज उठवत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. (govinda is not Osama Bin Laden; ashish shelar reply to cm uddhav thackeray)

 

संबंधित बातम्या:

तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

मुंबईतील ‘त्या’ नऊ मजली इमारतीशी तुमचा संबंध काय?; किरीट सोमय्यांचा भुजबळांना सवाल

लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा जाहीर दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?

(govinda is not Osama Bin Laden; ashish shelar reply to cm uddhav thackeray)