काश्मिरी नेता जेव्हा महाराष्ट्रातून लोकसभा लढवतो आणि निवडूनही येतो…वाचा पवारांनी सांगितलेली राजकीय गोष्ट

| Updated on: Feb 09, 2021 | 3:43 PM

आझाद यांनी महाराष्ट्रातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे आणि दोन वेळा त्यांनी वाशिम जिल्ह्याचं नेतृत्वही केलं आहे. पुढे त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवरही वर्णी लावण्यात आली होती.

काश्मिरी नेता जेव्हा महाराष्ट्रातून लोकसभा लढवतो आणि निवडूनही येतो...वाचा पवारांनी सांगितलेली राजकीय गोष्ट
Follow us on

मुंबई : गुलान नबी आझाद हे काँग्रेसमधील गांधी परिवारानंतर घेतलं जाणारं मोठं नाव आहे. काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले आझाद आज राज्यसभेतून निवृत्त झाले. राज्यसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सत्ताधारी भाजपला वेळोवेळी जेरीस आणलं. कलम 370, NRC, पुलवामा हल्ला, चीनची घुसखोरी ते शेतकरी आंदोलन, अलीकडच्या काळातील अशा अनेक मुद्द्यांवरुन आझाद यांनी भाजपवर जोरदार हल्ले चढवले. पण आज राज्यसभेतून निवृत्त होत असताना याच आझाद यांचं भावनिक रुप पाहायला मिळालं. राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचं हे मोठं नाव महाराष्ट्राशी जोडलं गेलेलं आहे, हे अनेकांना माहितीही नसेल.(Gulam nabi azad’s connection with Maharashtra)

जम्मू-काश्मीरमधील ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरुन राजकीय कारकिर्द सुरु करणाऱ्या आझाद यांनी महाराष्ट्रातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आहे आणि दोन वेळा त्यांनी वाशिम जिल्ह्याचं नेतृत्वही केलं आहे. पुढे त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवरही वर्णी लावण्यात आली होती. आझाद आज राज्यसभेचा निरोप घेत असताना त्यांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आझाद यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं उलगडून दाखवलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून पवार यांनी आझाद यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे.

1982 साल आझादांसाठी अविस्मरणीय

“आझाद यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केलं आहे. आझाद साहेब सुरुवातीच्या काळात संघटनेशी जोडले गेले होते. राजकारणाची सुरुवात त्यांनी जन्मू-काश्मीर युवक काँग्रेसच्या अध्यक्षाच्या रुपाने केली. पुढे काँग्रेसच्या तत्कालीन वरिष्ठ नेत्यांना त्यांना इंडियन युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 1882 हे साल आझाद यांच्यासाठी अविस्मरणीय राहिलं असेल. कारण, याच वर्षी त्यांचं लग्न झालं आणि याच वर्षी ते महाराष्ट्रातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली.”

‘वाशिमची जनता आझादांना विसरणार नाही’

“त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. मी प्रचारात म्हणत होतो की, काश्मीरवरुन आलेल्या आमच्या सहकाऱ्याला निवडून देऊ नका. त्यांच्याविरोधात आम्ही अनेक प्रचारसभा घेतल्या. तरीही ते मोठ्या मताधिक्यानं वाशिममधून निवडून आले. गुलाम नबी आझाद यांनी वाशिमच्या लोकांचा विश्वास जिंकला होता. त्यांनी सातत्याने वाशिमच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं. सिंचन, शेती, शिक्षण अशा क्षेत्रातील समस्या कशा दूर केल्या जातील, त्यावर त्यांनी काम केलं. काश्मीरवरुन आलेले आमचे सहकारी वाशिमच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत, हे वाशिमची जनता कधीही विसरली नाही”, अशा शब्दात शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं आणि आपुलकी उलडून सांगितली आहे.

‘वाशिमकर’ आझाद!

गुलाम नबी आझाद यांच्या कामाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितलं की, आझाद यांनी युवक काँग्रेसचे नेते म्हणून राजकारणा सुरुवात केली. जम्मू-काश्मीरमध्ये त्यावेळी तरुण वयात त्यांनी मोठं काम उभं केलं. तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. इंदिरा गांधी यांना आझादसारखा नेता लोकसभेत हवा होता. त्यावेळी महाराष्ट्र हा पूर्णपणे काँग्रेसमय होता. अशावेळी आझाद यांना महाराष्ट्रातून निवडून आणणं सोपं जाईल असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना वाटलं. म्हणून गुलाम नबी आझाद यांनी वाशिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पाडण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण एक नाही तर दोन वेळा जिंकून आले.

वाशिम जिल्ह्यातही आझाद यांनी विकासाची अनेक काम केलं. शेती आणि सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले. काश्मीरचे असले तरी ते महाराष्ट्र आणि खास करुन वाशिमकरांशी एकरुप झाले होते. आजही वाशिमचे लोक त्यांना वाशिमकर म्हणूनच ओळखतात, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

गुलाम नबी आझाद यांना पराभूत करण्यात पवार अपयशी ठरतात तेव्हा; शरद पवारांनीच ऐकवला संसदेत किस्सा

‘मी नशीबवान, मला पाकिस्तानात जावं लागलं नाही’, निरोपाच्या भाषणात गुलाम नबी आझाद भावूक

नरेंद्र मोदी राज्यसभेत का भावूक झाले? मोदींना प्रणव मुखर्जींची आठवण का झाली?

Gulam nabi azad’s connection with Maharashtra