Mumbai Rains : धो डाला… मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस, चाकरमान्यांचा विक ऑफ पाण्यात; जागोजागी पाणी साचले

| Updated on: Jun 25, 2023 | 9:34 AM

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात कालपासून सुरू झालेला पाऊस आजही सुरूच आहे. मुंबईत परळ, अंधेरी आणि घाटकोपरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

Mumbai Rains : धो डाला... मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस, चाकरमान्यांचा विक ऑफ पाण्यात; जागोजागी पाणी साचले
heavy rain
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. पावसाने दणका देताच मुंबईतील नालेसफाईची पोलखोल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईची पाहणी केल्यानंतरही पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची तुंबापुरी झाल्याचं चित्र आहे. काल दुपारी सुरू झालेला पाऊस आजही सुरूच आहे. त्यामुळे मुंबईत जागोगाजी पाणी तुंबले आहे. तर पावसामुळे मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आजही पाऊस सुरूच असून दिवसभर पाऊस राहणार असल्याचा अंदाज असल्याने चाकरमान्यांना विक ऑफच्या दिवशी घराबाहेर पडता येणार नाहीये.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात काल दुपारपासून पाऊस सुरू झाला. पावसाने चांगलाच जोर धरल्याने अनेक भागात पाणी साचलं. दादरच्या शिवाजी पार्कातही चांगलंच पाणी साचलं होतं. मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. रेल्वे रुळावरही पाणी आल्याने काल रेल्वेही उशिराने धावत होती. तर नवी मुंबईत काही ठिकाणी तळं साचल्या सारखी परिस्थिती होती. काल सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. अजूनही मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत अजूनही दमदार पाऊस सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर पाणीच पाणी

बोरिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात पाणी तुंबले आहे. त्यामुळे लोकांना पाण्यातून चालावे लागत आहे, वाहनांचे टायर पाण्यात बुडालेले दिसत आहेत. रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. आणखी पाऊस झाल्यास आजूबाजूच्या दुकानांमध्येही पाणी तुंबणार असल्याचं चित्रं आहे.

दोघांचा मृत्यू

गोवंडीत शिवाजीनगर येथील शिवार लाईनची साफसफाई करताना दोघांचा मृत्यू झाला आहे. गोवंडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्ता क्रमांक 10 वरील गटाराच्या सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच ठिकाणी बीएमसीचे पोलीस अधिकारी पोहोचले आणि लोकांनी लोकांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवर लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस आहे, त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला.

खारघरमध्ये पाणीच पाणी

खारघर रेल्वे स्टेशनच्या बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. प्रवाशांना कसरत करतच खारघरचा बोगदा पार करावा लागत आहे. मात्र पनवेल महानगरपालिकेचे एकही कर्मचारी जागेवर उपस्थित नसल्याने संताप व्यक्त केला जात होता.

नालेसफाईची पोलखोल

पहिल्याच पावसात मीरा-भाईंदर शहर पाण्याखाली गेलं आहे. मीरा-भाईंदर शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. मिरारोड पूर्वेच्या सिल्वर पार्क परिसरातील सुंदर सरोवर कॉम्प्लेक्स मध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलं आहे. मिरारोडच्या शीतल नगरमध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळतेय. तसेच शहराचे इतर ठिकाणीही पाणी साचलेलं आहे. पहिल्या पावसाने मिरा भाईंदर पालिका प्रशासनाचा शंभर टक्के नालेसफाईच्या दावा फेल ठरल्याचे दिसून येत आहे.

पालघरमध्ये जोरदार पाऊस

पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. डहाणू, तलासरी, पालघरसह पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे भात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीच संकट टळणार आहे.

अंबरनाथ, बदलापूल, उल्हासनगरात धुवाँधार

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात काल दुपारपासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी बसरत आहे. दुपारपासून अखंडपणे पाऊस पडत असल्याने शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र, पावसामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

ठाण्यात दमदार हजेरी

कालपासून सुरू झालेला पाऊस आजही सुरू आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या ठाणेकरांना हवेत गारवा जाणवल्यामुळे कुठेतरी दिलासा मिळाला आहे. ठाण्यात रात्रभर पाऊस सुरू होता. अजूनही सुरू आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या देखील उलमडून पडल्या आहेत बिपरजॉय चक्रीवादळामुळे आणि उशिरा का होईना पावसाने आपली दमदार हजेरी लावली आहे..