Sharad Pawar:भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, एनसीपीच्या प्रदेश कार्यकारिणीत काय म्हणाले शरद पवार?

| Updated on: Jul 12, 2022 | 7:07 PM

लोकशाहीमध्ये तुम्ही आणि मी यापेक्षा सामान्य लोक अधिक हुशार असतात. आपल्याकडे बघणारे हजारो लोक असतात. ते लोक बोलत नाहीत. पण मतदानाची संधी मिळाल्यावर ते निर्णय घेतात. लोक बघत असतात, निरीक्षण करतात आणि राजकारण्यांनाही जनता योग्य रस्त्यावर आणते.

Sharad Pawar:भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, एनसीपीच्या प्रदेश कार्यकारिणीत काय म्हणाले शरद पवार?
शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार?
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई – पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना (Shivsena)आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत ते बोलत होते. दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेक शिवसैनिक भेटायला येत होते. सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली, त्या लोकांच्या बाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत. असेही शरद पवार म्हणाले. अनेकजण बोलले की, ४० मधील एक-दोन अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. असे पवार म्हणाले आहेत.

सत्ता नसताना लोकांमध्ये जाता येते -पवार

सत्ता नसली तरी चिंता करण्याची गरज नाही. व्यक्तिगत अनुभव असा आहे की, सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा असतो. असेही शरद पवार म्हणाले. सत्तेत असताना आपण अनेक निर्णय घेतो, धोरणं आखतो. त्याची माहिती घेण्याची साधने काय? तर तालुका स्तरावरील अधिकारी जिल्हा, राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत अहवाल पाठवतात. तो शंभर टक्के खरा असतो असे नाही. पण सत्ता नसताना थेट लोकांमध्ये जाता येतं. दौरे करताना अनेक लोकांच्या भेटीगाठी होतात, त्यातून अनेक प्रश्न समजतात. दुसरी गोष्ट अशी की, सत्ता नसताना पक्ष संघटना अधिक प्रभावी करता येते.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत

सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरु आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, असे वक्तव्य केले आहे. ओबीसींना घेऊनच निवडणुका झाल्या पाहीजेत, हा आपला दृष्टीकोन आहे. ओबीसींना बाजूला ठेवून निवडणुका होता कामा नयेत. असेही ते म्हणाले. यानिमित्ताने नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची जबरदस्त शक्ती उभी करण्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. असे पवारांनी सांगितले.

लोकं पाहत असतात, मतदानातून उत्तर देतात

लोकशाहीमध्ये तुम्ही आणि मी यापेक्षा सामान्य लोक अधिक हुशार असतात. आपल्याकडे बघणारे हजारो लोक असतात. ते लोक बोलत नाहीत. पण मतदानाची संधी मिळाल्यावर ते निर्णय घेतात. लोक बघत असतात, निरीक्षण करतात आणि राजकारण्यांनाही जनता योग्य रस्त्यावर आणते. आज केंद्रीय सत्ता जरी ठिकठिकाणचे राज्य बरखास्त करण्याचे काम करत असली तरी आज ना उद्या सामान्य जनता याचा निकाल घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांची तयारी असली पाहीजे.

एकही आमदार फुटला नाही, याचा अभिमान

एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो.सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगले काम केल्याचे ठिकठिकाणी ऐकायला मिळते. प्रदेशाध्यक्षांनी देखील सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना व जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. असे कैतुकही शरद पवारांनी केले.