दुष्काळमुक्ती! अवघ्या सात पैशात समुद्राचं खारं पाणी शुद्ध बनवा!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : जगभरात पाण्याची समस्या वाढू लागली आहे. यामुळे समुद्राचे खारे पाणी शुद्ध करून वापरण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यातच आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी भर घातली असून अवघ्या सात पैशात एक लिटर खारे पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प यशस्वी केला आहे. याच्या सर्व चाचण्या झाल्या असून लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. मुंबईसारख्या शहरात डिसेंबरमध्ये पाणीटंचाई, […]

दुष्काळमुक्ती! अवघ्या सात पैशात समुद्राचं खारं पाणी शुद्ध बनवा!
Follow us on

मुंबई : जगभरात पाण्याची समस्या वाढू लागली आहे. यामुळे समुद्राचे खारे पाणी शुद्ध करून वापरण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यातच आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी भर घातली असून अवघ्या सात पैशात एक लिटर खारे पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प यशस्वी केला आहे. याच्या सर्व चाचण्या झाल्या असून लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

मुंबईसारख्या शहरात डिसेंबरमध्ये पाणीटंचाई, तर राज्यातील अनेक भागात दुष्काळ जाणवू लागला आहे. जगभरात अनेक ठिकाणी पाण्याला सोन्याचे मोल आहे. जलशुद्धीकरणासाठी विविध स्तरांवर संशोधन सुरू आहेत. यातील काही प्रयोग यशस्वी झालेही. मात्र, यातून मिळणारे शुद्ध पाणी खूप महाग असते. त्याच्या शुद्धतेबाबतही साशंकता आहे. हे सर्व होत असतानाच आयआयटी मुंबईतील मेटलर्जिकल इंजिनीअरिंग अॅण्ड मटेरिअल सायन्स विभागातील नॅनोस्ट्रक्चर्स इंजिनीअरिंग अॅण्ड मॉडेलिंग लॅबमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी हे संशोधन पूर्ण केलंय.

यासाठी त्यांनी शेतातील कचऱ्याचा वापर केला आहे. शेतामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून त्यांनी ग्राफिन ऑक्साईडची निर्मिती केली असून या प्रक्रियेमुळे जलशुद्धीकरण रसायनविरहित होते, असा दावा संशोधकांनी केला आहे.

या प्रकल्पात तीन प्रकारची चाळणी वापरण्यात आली. पहिल्या टप्प्यात मातीमधून दूषित पाणी नेले जाते. त्यात काही जंतू नाश पावतात. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ग्राफिन ऑक्साईडमधून हे पाणी जाते. यात बहुतांश क्षार कमी होतात. यानंतर यूव्ही फिल्टरमधून हे पाणी गाळले जाते. यानंतर हे पाणी शुद्ध होत असल्याचे प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी सांगितले.

या एका प्रकल्पातून उद्योगातील रसायनयुक्त पाणी, खारे किंवा क्षारयुक्त पाणी, गढूळ पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. यातील खारे आणि गढूळ पाणी पिण्यायोग्य होते. यासाठीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने दिलेल्या मानांकनानुसार त्या पाण्याचा दर्जाही आला आहे. याच्या पेटंटची प्रक्रिया सुरू असून लवकरत ते व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या टीममध्ये विध्यार्थी अभिषेक पांडे, मधुरिमा डेब, प्रणव पवार,  सौशभ शुक्ला आणि प्रोफेसर सुमित सक्सेना यांचा समावेश आहे. प्रोफेसर सक्सेना यांनी हे पाणी पिऊन दाखवले.