पटोले-थोरात वादातील इनसाईट स्टोरी, काँग्रेसमध्ये राजकीय हाहाकाराचं कारण काय?

| Updated on: Feb 07, 2023 | 4:43 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या वादातील इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.

पटोले-थोरात वादातील इनसाईट स्टोरी, काँग्रेसमध्ये राजकीय हाहाकाराचं कारण काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या जे सुरुय ते अतिशय अनपेक्षित असंच आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. दुसरीकडे काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे त्यांच्या संयमी स्वभावामुळे ओळखले जातात. दोन्ही नेते हे त्यांच्या जागेवर अतिशय प्रतिष्ठावंत असेच आहेत. पण याच दोन बड्या नेत्यांमध्ये वाद उफाळल्याने काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही, हे स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या वादातील इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. “सत्यजीतसाठी मी दिल्लीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. सत्यजीतला पाठिंबा देण्यास सर्वांची तयारी होती. मात्र अचानक शेवटच्या दिवसांत राजकारण झालं. मला अंधारात ठेवून सगळं केलं गेलं”, असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलाय.

बाळासाहेब थोरात यांची नेमकी भूमिका काय?

सत्यजीत तांबे माझ्या घरातले आहेत. राजकारणात नाते जपणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

सत्यजीतसाठी मी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी बोललो.

हे सुद्धा वाचा

सत्यजीतला पाठिंबा देण्यासाठी सगळे तयार होते.

मात्र अचानक शेवटच्या दिवसात राजकारण झालं

मला अंधारात ठेवून राजकारण केलं. एच के पाटील यांनाही अंधारात ठेवलं गेलं अशी शंका आहे.

नाराजीचं पत्र लिहिल्यावर मला दिल्लीतून फोन आले. माझ्या नाराजीबद्दल दिल्लीतून विचारणा केली गेली.

नाना पटोले यांची भूमिका

आयुष्यात कधी गलिच्छ राजकारण केलं नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आलेला नाही.

ज्या पद्धतीचं राजकारण सुरु आहे तसं राजकारण मी कधी केलेलं नाही. मी सर्वसामान्य घरातून राजकारणात आलेलो आहे. या पद्धतीचं आडवं-उभं राजकारण मला जमलं नाही.

या प्रकरणातून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. विधान परिषदेच्या निवडणुकीत जसं गलिच्छ राजकारण करण्यात आलं तसं मी नाही करत. तसं मी माझ्या जीवनात करणारही नाही.

बाळासाहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाळासाहेबांनी राजीनामा दिला असं तुम्ही लोकं बोलत आहात. पण अजून तसा कुठल्याही राजीनाम्याची माहिती आलेली नाही

सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी मागितली नव्हती : नाना पटोले

“सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी मागितलीच नव्हती. स्वत: बाळासाहेब थोरात आमच्या पार्लमेंट्री बोर्डात आहे. त्यांनीदेखील हा विषय काढला नाही”, असं नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना सांगितलंय.

“मी सुरुवातीलाच यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. हा कुटुंबातला वाद आहे. तो पक्षावर येऊ देऊ नका. त्यामुळे आम्ही कालपर्यंत सोबत चांगलं काम करत होतो. आताच त्यांना काय प्रोब्लेम झाला? मला माहिती नाही. पण असा प्रोब्लेम होऊ शकत नाही. त्यांचं कुठलं पत्र मिळालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

नेमका वाद काय?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला. सुधीर तांबेंना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण सुधीर तांबेंनी एबी फॉर्म असून सुद्धा अर्ज भरला नाही. सुधीर तांबेंएवजी नाशिकमधून त्याचवेळी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला.

पक्षविरोधी काम केल्याने काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई केली. या कारवाईनंतर काँग्रेसमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर आला.

नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत थोरात आणि सत्यजीत तांबे यांनी मौन बाळगलं. पण नाना पटोलेंसह आणि इतर नेत्यांकडून सत्यजीत तांबेंवर आरोप करण्यात आले. त्यानंतर सत्यजीत तांबे पदवीधर निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाले.

निवडणुकीत जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले.

बाळासाहेब थोरांतानी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून नाना पटोले यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचं थोरातांनी पत्रात म्हटलं.