राज्यपाल नियुक्त सदस्यावरुन चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट, जयंत पाटलांचं उत्तर

| Updated on: Apr 11, 2020 | 2:44 PM

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राज्यपाल नियुक्त (Jayant Patil answers to Chandrakan Patil) आमदारकीचा तांत्रिक आक्षेप खोडून काढला.

राज्यपाल नियुक्त सदस्यावरुन चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट, जयंत पाटलांचं उत्तर
Follow us on

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राज्यपाल नियुक्त (Jayant Patil answers to Chandrakan Patil) आमदारकीचा तांत्रिक आक्षेप खोडून काढला. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालनियुक्त आमदार होऊ शकत नाहीत, असं म्हणत त्यांनी घटनेकडे बोट दाखवलं होतं. त्याला जयंत पाटील यांनी टीव्ही 9 शी संवाद साधताना उत्तर दिलं. (Jayant Patil answers to Chandrakan Patil)

जयंत पाटील म्हणाले, “भाजपला विनंती, कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हा, छोट्या छोट्या गोष्टीत अडकू नका. राज्यपालांकडे राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला, त्यातील एका जागेवर मुख्यमंत्र्यांना ठराव करुन पाठवण्याचा निर्णय घेतला, कोरोनामुळे सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, राज्यपाल नियुक्त जी रिक्त जागा आहे, तिथे मुख्यमंत्र्यांना नेमण्यासाठी राज्यपालांनी मंत्रिमंडळ ठरावाची अट घातली, आम्ही तसा ठराव केला, मुख्यमंत्री कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे ते या ठरावाने पूर्ण होईल, त्यामध्ये तांत्रिक अडचणीचा प्रश्न नाही, राज्यपालांनी वेळ न लावता निर्णय घ्यावा, त्यांची शपथ पूर्ण करावी आणि दोन महिन्यानंतर पुन्हा जी नवी नावं देऊ त्यावेळी आम्ही बघू काय करायचं ते.. त्यामुळे भाजपने यामध्ये लक्ष देण्यापेक्षा कोव्हिड १९ विरुद्ध थोडं लक्ष द्यावं”

वाधवांना पत्र देणं चुकीचंच
ज्या सचिवांनी वाधवांना पत्र दिलं, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की माझे मित्र आहे म्हणून परवानगी द्यावी, त्यामुळे कुठला मंत्री समावेश असणं शक्य नाही, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, हा अधिकारी फडणवीसांच्या काळातच नेमला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

वाधवांना पाठवणं हे चुकीचंच, त्याचं समर्थन नाहीच, त्याची चौकशी होऊन दोषींना शिक्षा होईल, सर्वसामान्य माणसाला परवानगी मिळत नाही, श्रीमंतांना कशी मिळेल, असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला.

आमचं सरकार अशा लोकांच्या पाठिशी नाही, प्रशासनात कुणाचे लागेबांधे असले, तर त्याचा फायदा त्यांनी करुन दिला तर त्याची जबाबदारी मंत्र्यांवर येऊ शकत नाही, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

इस्लामपूर पॅटर्न
इस्लामपुरात काटेकोर नियोजन केलं, जे कुटुंब परदेशातून आलं होतं, तो परिसर सील केला,त्या कुटुंबीयांचा ज्यांच्याशी संपर्क आला,त्या सर्वांची 347 लोकांची यादी काढून, टेस्ट केली,जे निगेटिव्ह आले त्यांनाही क्वारंटाईन केलं, पॉझिटिव्ह होते त्यांच्यावर तातडीने उपचार केले, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

आशा वर्कर्सचं जबरदस्त काम
इस्लामपुरात कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर प्रत्येक तालुक्यात जाऊन महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा करुन लॉकडाऊन केलं, आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जबरदस्त काम केलं, प्रत्येक घरात जाऊन चौकशी केली, असं म्हणत जयंत पाटील यांनी कौतुक केलं.
जे संशयित होते त्यांचे स्वॅब घेऊन तातडीने चाचणीला पाठवले, एक रुग्णालय कोव्हिडसाठी ठेवलं, व्हेंटिलेटरची व्यवस्था केली, २५ च्या वर पॉझिटिव्ह पेशंट गेले नाहीत, असं जयंत पाटील म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीत इस्लामपुरात काय केलं ते सांगितलं, लॉकडाऊन वाढल्यास काय करता येईल, याबाबतची चर्चा झाली, कृषी, मजूर, घटकाशी निर्णय घ्यावे लागेल, शेतमाल बाजारात पोहोचवणं आवश्यक आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

लोकांना आहे तिथेच ठेवून, त्यांच्यापर्यंत महत्त्वाच्या गोष्टी, वस्तू पोहोचवण्याचं नियोजन सुरु आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महापुरामुळे आम्ही लोकांमध्ये होतो, त्यावेळच्या सरकारबाबत लोकांमधून प्रतिक्रिया येत होत्या, आता कोरोना संसर्गावेळीही आम्ही ग्राऊंडवर उतरुन काम करत आहोत, जनतेचं प्रतिनिधीत्व करताना ते करावंच लागतं, पुढाकार घ्यावाच लागतो, असं जयंत पाटील म्हणाले.

मंत्रिमंडळ योग्यप्रकारे काम करत आहे, मुख्यमंत्री सूचनांचा योग्य विचार करुन निर्णय घेतात, व्हिडीओ कॉन्फरन्सनेही बैठक होते, लोकांना थोडा त्रास होईल, कटूपणा येईल, पण अंतिम निकाल हा चांगलाच असेल, असा निर्णय घ्यावा लागेल, अशा पद्धतीने काम सुरु आहे, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

मुख्यमंत्री राज्यपाल कोट्यातून आमदार होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट